सुप्रीम कोर्टाच्या निकालावर शरद पवार, संजय राऊत म्हणाले…
एबीपी माझा वेब टीम | 26 Nov 2019 12:15 PM (IST)
उद्याच बहुमत चाचणी होणार, महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर सुप्रीम कोर्टान निकाल दिला आहे. तसेच संपूर्ण प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करण्याचेही निर्देशही देण्यात आले आहे.
मुंबई : महाराष्ट्रात सुरु असलेला सत्तापेच उद्या म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी संपण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी घ्यावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, त्याचे लाइव्ह थेट प्रक्षेपण करा असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी दीड तास चाललेल्या युक्तिवादानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता. बहुमत नसताना घाईघाईने शपथविधी उरकणाऱ्या फडणवीस सरकारची विश्वासदर्शक ठरावाची तारीख लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केली होती. त्यानुसार उद्याच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्यात यावी आणि हंगामी अध्यक्षांची निवड करण्यात यावी असंही कोर्टाने म्हटले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर फडणवीस सरकारकडे आता केवळ दीड दिवस शिल्लक आहे. Supreme Court on Maharashtra Govt Formation | 27 नोव्हेंबर म्हणजेच उद्या विश्वासदर्शक ठराव मांडला जावा : सुप्रीम कोर्ट | ABP Majha आम्ही 30 तास काय 30 मिनिटांतही बहुमत सिद्ध करु - संजय राऊत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आमचे सगळे मुद्दे सुप्रीम कोर्टाने मान्य केले असून सत्याचा विजय होतो हे न्यायदेवतेनं दाखवून दिल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. या देशात आजही सत्य पराभूत होत नाही असेही ते म्हणाले. तसेच आम्ही 30 तास काय 30 मिनिटांतही बहुमत सिद्ध करु शकतो असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच संजय राऊत यांनी ‘सत्य मेव जयते’ असं ट्विट केलं आहे. लोकशाहीची मूल्य आणि घटनेतील तत्वांचं पालन करत सुप्रीम कोर्टानं निकाल दिला : शरद पवार सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहे. “लोकशाहीची मूल्य आणि घटनेतील तत्वांचं पालन करत सुप्रीम कोर्टानं निकाल दिला, त्याबद्दल आभार! संविधान दिनाच्या दिवशी महाराष्ट्राबद्दलचा निकाल आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन” अशा आशयाचं ट्विट पवारांनी केलं आहे. संविधान दिनाच्या दिवशी संविधानाचा विजय : पृथ्वीराज चव्हाण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. आज संविधान दिनाच्या दिवशी संविधानाचा विजय झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. आम्ही बहुमत सिद्ध करायला तयार आहोत : चंद्रकांत पाटील ‘आम्ही निर्णयाचा आदर करतो. उद्या बहुमत सिद्ध करायला आम्ही तयार आहोत, उद्या बहिमत सिद्ध करु’ सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर चंद्रकांत पाटलांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या घटनाविरोधी प्रवृत्तीला सर्वोच्च न्यायालयाने जाच लावला : नवाब मलिक लोकशाही मूल्ये जतन करत 24 तासात खुले मतदान घेत बहुमत दाखविण्याचे आदेश माननिय सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.भाजपचे लोकशाहीस घातक धोरण लक्षात घेता थेट प्रक्षेपण करण्यास सांगून भाजपच्या घटनाविरोधी प्रवृत्तीला सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने जाच लावला असल्याचं ट्विट राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा : एकनाथ शिंदे सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणजे सत्याचा विजय असून मी या निर्णयाबद्दल कोर्टाचे आभार मानतो. सत्याला न्याय हा मिळतो आणि आज हे कोर्टाने दाखवून दिलं आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच स्थापन झालेल्या सरकारने आता नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा देऊन बहुमताच्या सरकारला संधी दिली पाहिजे अशी मागणी एकनाथ शिंदेनी केली आहे. तसेचं बाळासाहेबांचं स्वप्न साकार होताना दिसतं असल्याचंही शिंदे म्हणाले. Mahavikas Aaghadi | महाविकासआघाडीच्या 162 आमदारांच्या सह्यांचं पत्र एबीपी माझाच्या हाती | ABP Majha संबंधीत बातम्या