मुंबई: महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेलं पत्र हे निव्वळ बोगस असल्याचा दावा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. महाविकासआघाडीनं दिलेल्या पत्रामध्ये सत्तास्थापन केल्यानंतरचा मुख्यमंत्री कोण याचा उल्लेख टाळला गेलेला आहे, कुठेही त्यांचं नेृतृत्त्व करणाऱ्या नेत्याचं नावही नाही, त्यामुळे बिनबुडाचं शरीर असलेलं हे पत्र देऊन राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते आपल्या कार्यकर्त्यांची आणि आमदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत असं आशिष शेलार म्हणाले आहेत. याबद्दल बोलताना शेलारांनी नवा सिनेमा पागलपंतीप्रमाणेच ही राजकारणाची पागलपंती सुरु असल्याचं म्हटलं.


काँग्रेसने विधीमंडळ गटाचा नेता ठरवलाच नाही आणि त्या पत्रावर गटनेत्याची स्वाक्षरीही नाही, नेतृत्त्व करणाऱ्या नेत्याचं नाव राज्यपाल महोदयांना सूचित केलेलं नाही. महाशिवआघाडीने केलेल्या या दाव्यावरुन आजसुद्धा हेच स्पष्ट होतंय की राष्ट्रवादीचा गटनेता अजूनही अजित पवारच आहेत. अजित पवारांना कायदेशीररित्या काढलं गेलेलं नाही त्यामुळे व्हिप त्यांचाच चालेल. सोबतच दिलेल्या पत्रावर अजित पवारांची सही नाही असंही शेलार म्हणाले. ज्यांची स्वाक्षरी आहे त्यांना अजून गटनेता म्हणून मान्यतासुद्धा नाही. त्यामुळे गटनेता नाही, अजित पवारांची सही नाही म्हणजे हे पत्र केवळ आपल्या पक्षातल्या नेत्यांना शमवण्यासाठी किंवा बंड आणि आमदारांची असंतुष्टता थांबवण्यासाठी केलेला प्रयत्नच आहे असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं.

Ashish Shelar |  महाविकासआघाडीकडून राज्यपालांना दिलेलं 162 आमदारांच्या समर्थनाचं पत्र बोगस- आशिष शेलार