पालघर : आजच्या युगात शेतीत महिला मोठी भूमिका बजावताना दिसत आहेत. तसेच शेतीतल्या रोजगारातही महिलांचा वाटाही वाढत आहे. त्याचेच उदाहरण म्हणजे गातेस गावच्या शेतकरी कल्पिता कुमार पष्टे. खरं तर कल्पिता पष्टे यांचे पती कुमार पष्टे हे शेतकरी. कुमार पष्टे यांचे चारही भाऊ शेतकरीच. मात्र, सर्वजण फक्त भातशेती न करता शेतीतील नवनवीन प्रयोग करत आधुनिक शेतीकडे वळलेले. मागील 4 ते 5 वर्षांपासून कुमार पष्टे यांनी तब्बेतीच्या कारणाने शेतीकडे थोडे लक्ष कमी केले. मात्र, त्यांच्या पत्नी कल्पिता पष्टे यांनी आपल्या पतीच्या शेतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत या शेतीला आधुनिकतेची जोड देत पतीच्या मार्गदर्शनाखाली शेतीतील पुढची वाटचाल सुरू ठेवली आहे. जवळपास 12 ते 15 एकर जागा असलेल्या शेतीत ते रब्बी हंगामात हरभरा, झेंडू, डांगर, कांदा, धने, मूग, वाल, चवळी, तूर, तीळ अशा विविध पिकांची शेती करतात तर पावसाळ्यात भातशेती देखील करतात.




माणसाला वेगवेगळी व्यसन असतात. तसेच व्यसन शेतकऱ्यांनादेखील जडलेले आहे. शेती फायद्यात असो की तोट्यात मात्र शेती करण्याचे व्यसन हे शेतकऱ्याचं सुटत नाही. कल्पिता पष्टे यांनी आपल्या 5 एकर जागेमध्ये 60 हजार झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. ही पूर्ण झेंडूची लागवड ही ठिबक सिंचनावर केल्याने मजुरांची संख्या देखील कमी प्रमाणात लागत आहे. या वर्षी झेंडूचा बाजारभाव एकदम कोसळल्याने त्यातून फायदा होण्याचा संभव कमीच असला तरी त्यांनी फुलवलेल्या लाल-पिवळ्या झेंडूकडे बघून त्यांना नक्कीच समाधान वाटतं. झेंडूच्या बाजूला आंतरपीक म्हणून त्यांनी डांगराची शेतीदेखील केली आहे. कल्पिता यांनी आपल्या पतीच्या मदतीने पावसाळ्यानंतर चार एकरमधे रब्बी हरभरा पेरणी केली होती. यामध्ये जवळपास त्यांना मजुरी आणि खर्च जाऊन 50 ते 60 हजारांचा नफा झाला. त्याच बरोबर त्यांनी चार एकरमध्ये कांदा लागवड देखील केली असून अर्धा एकरमध्ये बियांणांसाठी कांदा लागवड केली आहे. त्याच बरोबर घरासाठी लागणारे वाल, मूग, तीळ, धने याची लागवड करून त्यांनी त्यातून उत्पन्न घेतले आहे.

कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर, आतापर्यंत 7 लाखांहून अधिक कर्जखात्यात 4 हजार 807 कोटींची रक्कम जमा

आधुनिक शेतीची कास

शेतीमध्ये विविध प्रयोग करत असताना देशी गाई, म्हशीचे पालन करून दुग्ध व्यवसाय देखील सुरू आहे. अशा प्रकारे कल्पिता पष्टे या विविध पिकांची लागवड करत शेतीतून वर्षाकाठी 3 ते 4 लाखांचे उपत्न घेत आहेत. त्याच बरोबर घरात लागणारा भाजीपाला आणि कडधान्याची लागवड करत वर्षाकाठी भाजीपाल्यावर आणि कडधान्यावर खर्च होणारे लाख रुपयांची बचत करत आहेत. त्याचबरोबर शेतीतून ते दररोज 8 ते 10 मजुरांना रोजगार देखील उपलब्ध करून देत आहेत. कल्पिता या शेतीबरोबरच गावात कायदा आणि शांतता राखण्याचे काम देखील करतात. त्या गावच्या पोलीस पाटील आहेत. त्यांनी शेतीबरोबर पोलीस पाटलाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करून गावाला तंटामुक्त पुरस्कार प्राप्त करून दिला आहे. गावामध्ये आणि समाजामध्ये एकात्मता आणि बंधुता निर्माण करणाऱ्या स्वाध्याय परिवाराच्या त्या सदस्या आहेत. गावामध्ये एकोपा, भावनिक ऐक्‍य, तसेच व्यक्तीमधील भाव-जागृती व अस्मिता जागृती हे रचनात्मक कार्य त्या करत आहेत. गावात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.



'त्या' शेतकऱ्याच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च भाजप उचलणार; प्रविण दरेकरांची माहिती
महिला शेतकरी ह्या शेती व्यवसायाचा कणा
देशभरामध्ये बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार महिलांच्या काही प्रश्नांचे स्वरूप बदलले आहे. सध्या महिलांना समान अधिकार मिळावेत आणि महिलांचे सबलिकरण व्हावे यासाठी मोहीम जोर धरत असतानाच आपण ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना तसेच गावच्या प्रगतीसाठी आणि एकोप्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कल्पिता कुमार पष्टे यांच्यासारख्या महिलांना दुर्लक्षित करता कामा नये. महिला शेतकरी या आपल्या देशातील शेती व्यवसायाचा कणा असून त्यांचे शेतीबरोबरच सामाजिक योगदान विसरता येणार नाही. त्यांना जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचा 2018 साली आधुनिक पद्धतीने केलेल्या शेतीबद्दल आदर्श महिला शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाकडून देखील कृषीमधील दिल्या जाणाऱ्या तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय पुरस्कार हे कल्पिता कुमार पष्टे सारख्या महिला शेतकऱ्यांना देऊन त्यांचा गौरव करून महिलांचे मनोधैर्य वाढविण्याची नितांत गरज आहे.

Special Report | नव्या तंत्राने केळी उत्पादन क्षेत्रात क्रांती, कमी उत्पादन खर्चात जास्त नफा | ABP Majha