पुणे :  चारच दिवसांपूर्वी पुण्यात औंध परिसरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मयूर मुंडे यांनी स्वतःच्या जागेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर बांधलं आहे. त्यात मोदी यांचा पुतळा देखील बसवण्यात आला होता. मोदी यांच्यावरील प्रचंड प्रेमाच्या भावनेतून एक मंदिर उभारलं होतं यानंतर बराच वाद ही निर्माण झाला होता, मात्र काल रात्री उशिरा मुंडे यांनी मोदींचा पुतळा मंदिरातून हटवला आहे.


पुण्यात मोदी भक्तानं उभारलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर, मंदिराची शहरात चर्चा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारण्यासाठी भावना फार चांगली होती व आहे. परंतु काल भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचा फोन आला.  जिवंत व्यक्तीच्या अशाप्रकारे मंदिर बांधून पूजा करणे हे भारतीय जनता पार्टीच्या तत्वाला व विचाराला अनुसरून नाही,अशी समज दिली आज आपल्या मनामध्ये पंतप्रधानांबद्दल असलेल्या भावना रस्त्यावर मंदिर बांधून जाहिरापणे व्यक्त न करता त्या भावना मनातच ठेवल्या जाव्यात. त्यानुसार कृती व कार्य करावे असे सांगण्यात आलं. त्यामुळे हा पुतळा स्थानिक नगरसेवक यांच्या कार्यालयात ठेवला असल्याचं मुंडे यांनी सांगितले. मात्र गेल्या चार दिवसांपासून प्रसिद्धी झोतात आलेले मुंडे पुतळा हटवल्यानंतर माध्यमांशी सविस्तर बोलणे टाळले. 


पंतप्रधान मोदींना देवाच्या रूपात मानून त्यांचे मंदिर उभारले आहे. पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंडे या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले आहे.   पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूर मधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला होता. याकरिता 1 लाख 60 हजार रुपये खर्च आला आहे. 15 ऑगस्ट 2021 दिवशी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. मंदिरासमोर मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता मोदी भक्तांकरिता लावण्यात आली होती. तसेच मंदिराबाहेर असलेल्या, फलकावर आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख देखील या कवितेच्या आधारे मांडण्यात आली होती.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे पुण्यातील पहिले मंदिर होते. परंतु देशपातळीवर देखील पहिलेच मंदिर असल्याचा दावा त्यांनी केला होता. मंदिरावरुन टीका केली तरी चालेल पण मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते म्हणून मंदिर उभारल्याची प्रतिक्रिया मयूर मुंडे यांनी दिली होती. गेली  मुंडे हे गेली 20 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करतात. पंतप्रधानांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर उभारले हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभारण्यात आल्याचे मुंडे म्हणाले होते.