मुंबईः पर्यटकांना आता तुरुंगाच्या भिंतींचा इतिहास जाणून घेता येणार आहे. जगभरात जेल टुरिझमची संकल्पना आता रुढ होत चालली आहे. त्यातच आता महाराष्ट्राचा गृह विभाग राज्यातही जेल टुरिझम सुरु करण्याच्या विचारात आहे.


मुंबईचं आर्थर रोड असो, पुण्याचं येरवडा किंवा नाशकातलं सेंट्रल जेल असो.. कारागृह म्हटलं की डोळ्यासमोर गुन्हेगारांसाठी दगडाच्या चारभिंतीआड उभारलेलं जग उभं राहतं. मात्र या कारागृहांना जेल टुरिझममुळे नवीन ओळख मिळणार आहे.

काय आहे जेल टुरिझम?

या प्रकल्पातंर्गत राज्यातील प्रमुख कारागृहांचा काही भाग पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. देशातले आणि राज्यातले अनेक कारागृह अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत.

अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरूंगवास भोगला. तर पुण्यातील येरवडा कारागृहात महात्मा गांधींना कैद करण्यात आलं होतं.

राज्यात एकूण 30 कारागृह आहेत. त्यापैकी अनेक कारागृहांच्या भिंती स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींच्या मूक साक्षीदार आहेत. त्यामुळे जेल टुरिझमची संकल्पना प्रत्यक्षात साकारल्यानंतर, कारागृहाच्या भिंतीआड दडलेला इतिहास पुन्हा उलगडता येणार आहे.

जेल टुरिझममुळे पर्यटकांना तुरुंग नावाचं जग काय असतं, याचा अनुभव घेता येईल. पर्यटकांना कैद्यांचा दिनक्रम समजवून सांगण्यात येईल. यावेळी कैद्यांनी बनवलेल्या वस्तूही प्रदर्शन आणि विक्रीकरता ठेवण्यात येणार आहेत.

जेल टुरिझममुळे कैद्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देखील मोठी मदत होणार आहे. त्यामुळं सरकारने जेल टुरिझमची संकल्पना फक्त कागदांवर मर्यादीत न ठेवता, लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी सुरू करणं गरजेचं आहे.