शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांसाठी सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम | 11 Mar 2018 09:31 PM (IST)
किसान सभा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकार्यांची उच्चस्तरीय बैठक आज रात्री वर्षा निवासस्थानी यांनी घेतली. या बैठकीत सरकार आंदोलकांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं.
मुंबई : किसान सभा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकार्यांची उच्चस्तरीय बैठक आज रात्री वर्षा निवासस्थानी यांनी घेतली. या बैठकीत सरकार आंदोलकांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं. मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या समितीत एकूण 6 मंत्री असतील. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख यांचा या समितीत समावेश आहे. उद्या दहावी आणि बारावीचा पेपर असल्याने लाखो विद्यार्थ्यांना तो पेपर देण्यासाठी सुरळीतपणे परीक्षा केंद्रांपर्यंत जाता यावे, यासाठी वाहतुकीचा कोणताही खोळंबा होणार नाही, यादृष्टीने आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान उद्या सोमवारी किसान सभेच्या शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला सर्व संबंधीत खात्यांच्या मंत्र्यांना आणि सचिवांना उपस्थित राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत महसूल, कृषी, अर्थ, पणन, जलसंपदा, आदिवासी, ग्रामविकास, ऊर्जा, रोजगार हमी या विभागाच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्यावर मोर्चेकरी शिष्टमंडळाशी समन्वय राखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गाण्यातून वेदनेचा हुंकार ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर जकात नाक्याच्या मोकळ्या जागेवर शनिवारी रात्री या सर्व शेतकऱ्यांनी विश्राम घेतला. शेकडो किलोमीटर पायी चालून आलेले हे शेतकरी मात्र थकले नव्हते. रात्री काही शेतकऱ्यांनी झोप काढली, तर काही शेतकऱ्यांनी ढोलकी, पिपाणीच्या तालावर ठेका धरला. पायात पैंजण बांधून या शेतकऱ्यांनी पारंपरिक नृत्य सादर केलं. तसंच क्रांतिगीतं, पारंपरिक गीतं गाऊन क्षणभर आपला सकाळपासून आलेला शीण घालवला. वाहतुकीत बदल किसान लाँग मार्चमुळे मुलुंड ते सोमय्या मैदान- चुनाभट्टीपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांना पूर्व द्रुतगती मार्गावर बंदी घालण्यात आली आहे. याच कालावधीमध्ये मुंबईहून ठाण्याला जाणारी अवजड व माल वाहतूक करणारी वाहने वाशी खाडीपूल, ऐरोली, विटावा मार्गे ठाणे अशी वळवण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांची पदयात्रा सुरु असताना एक मार्ग छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा असेल. मात्र यावेळी या वाहनांना वेगमर्यादा ताशी 20 कि.मी. ठेवण्याचे बंधन असणार आहे. शेतकरी पदयात्रेच्या दरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने या मार्गाचा वापर करणे शक्यतो टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. त्याचबरोबर लालबहादूर शास्त्री मार्ग, सायन-पनवेल मार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग याचा वापर करावा अशी सूचनाही वाहतूक पोलिसांनी दिली आहे. धर्मा पाटील यांचा मुलगा मोर्चात मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्रही गावातील 25 शेतकऱ्यांसह या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत विधीमंडळाला घेराव घालण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. कर्जमाफी, शेतमालाला योग्य हमी भाव, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती अशा मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. याआधी राज्यातल्या शेतकऱ्यांनी संप पुकारुन सरकारविरोधातला आपला रोष व्यक्त केला होता. त्यानंतर सरकारने 35 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र त्यातून कुणाच्या हाती फारसं काही न लागल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. मागण्या काय आहेत? -संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, नद्या जोड प्रकल्पांचा प्रश्न, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना, बोंडअळी व गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न -कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात -शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्या -शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या -स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अमलबजावणी करा -वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा -पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून राज्यातील शेती समृद्ध करा