मुंबई : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. विधानसभेत भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 135 जागा लढणार आहेत तर मित्रपक्षांना 18 जागा सोडण्यात येणार आहेत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. रविवारी चंद्रकांत पाटील यांनी मराठवाड्यातील दुष्काळी भागांची पाहणी केली, तिथल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी बोलत असताना पाटलांनी युतीचा फॉर्म्युला सांगितला.


शिवसेनेच्या आणि भाजपच्या जागा ठरल्या आहेत, त्यामुळे आता केवळ कोणत्या घटक पक्षाला किती जागा मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. महायुतीत रामदास आठवले यांचा रिपाइं, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटेंचा शिवसंग्राम आणि सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना हे घटकपक्ष आहेत.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले होते. त्यामध्ये भाजपने 122 आणि शिवसेनेने 63 जागा जिंकल्या होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढले होते. त्यामध्ये भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या आहेत.

व्हिडीओ पाहा



चंद्रकांत पाटील यांनी काल डोंबिवलीत एका कार्यक्रमात सांगितले की, कर्जाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी शेतीसाठी आधी बँकेकडून कर्ज घेतो. मात्र दुष्काळामुळे कर्जाची परतफेड होऊ शकत नाही. त्यामुळे बँक दुसऱ्यांदा कर्जही देत नाही. मग सावकारी कर्जाच्या विळख्यात शेतकरी अडकतो आणि आत्महत्येसारखं पाऊल उचलतो.

या सगळ्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 6 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. शिवाय शेतमजुरांनाही रोजगार हमी योजनेतून पगार देण्याची सरकारची योजना आहे, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.