Yavatmal News यवतमाळ : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) पन्नास वेळा उपोषण करायला लावता आणि त्यानंतर निव्वळ आश्वासन देऊन सोडायला लावता. राज्यातल्या लबाडांच्या मागे लागून आरक्षण मिळणार नाही, तर हा प्रश्न केंद्रासोबत भांडल्या शिवाय मार्गी लागणार नाही. अशी बोचरी टीका करत खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अरविंद सावंत हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी काँग्रेसनेते माणिकराव ठाकरे यांच्या यवतमाळच्या (Yavatmal News) राहत्या घरी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील राजकीय समिकरणावरील चर्चेसाठी ही भेट असल्याची माहितीही पुढे आली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मराठा- ओबीसी आरक्षणासंदर्भात (Maratha and OBC Reservation) भाष्य करताना सरकारवर निशाणा साधला आहे.


भुलथापांना बळी न पडता जागे व्हा आणि जागा दाखवा- अरविंद सावंत


आरक्षणाची मर्याद 50 टक्के आहे, ती वाढवली पाहिजे. आजही तामिळनाडू मध्ये 69% आरक्षण आहे. आजजरी आरक्षणाची मर्यादा 20 टक्याने वाढविली तर केंद्राने यात ढवळाढवळ करू नये. राज्यातील वंचितांना याचा लाभ मिळाला पाहिजे. त्यामुळे कायमस्वरूपी प्रश्न मिटेल. पंतप्रधान मोदी यांनी सगळे कारखाने विकायला काढले आहेत. रेल्वेत सर्व खासगीकरण सुरू आहे. आरक्षण मिळाले तर नोकऱ्या मिळणार नाही. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे लबाडीला आणि भुलथापांना बळी न पडता जागे व्हा आणि यांना जागा दाखवा, असे आवाहन खासदार अरविंद सावंत यांनी बोलताना केले आहे. 


लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम राज्यपाल मार्फत केले जातंय


येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये निवडणुकीची घोषणा होईल. आमदार पात्र-अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सध्या सुरू आहे.  उद्या हे अपात्र झाले तर अपात्र लोकांनी 12 पात्र लोकांना निवडून दिले का, असा प्रश्न उपस्थित होईल. मग पुन्हा जे पात्र होणार त्यांना अपात्र करणार का? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे पहिले सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू द्या आणि त्यानंतरच निवडणुका घ्या. अशी मागणी अरविंद सावंत यांनी यावेळी केली आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचा काम राज्यपालामार्फत केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या