Yavatmal Washim वाशिमशिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आजपासून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात आपला सुनिश्चित दौरा करणार आहेत. 12 आणि 13 मार्चला यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकी आणि संवाद मेळाव्यातून स्वतः उद्धव ठाकरे हे पक्षाला बळकटी देणार आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षात उभी फुट पडल्यानंतर शिंदे गटात गेलेल्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांचा हा मतदारसंघ असून, चार ठिकाणी उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सभेमध्ये नेमके काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


बैठका आणि संवाद मेळाव्यातून ‘मोर्चे’ बांधणी!


देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने देखील कंबर कसली असून, आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे स्वतः वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचे दौरे करून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठोपाठ आता उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या दौरा यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात करण्याचे सुनिश्चित केले आहे.  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनकडून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात संजय देशमुख यांची उमेदवारी जवळ जवळ निश्चित मानली जात असतांना, या सभेतून अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


गद्दारांना धडा, तर निष्ठावंतामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी हा दौरा


मिशन लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन ठाकरे गट निवडणुकीच्या कामाला लागले आहे. अशात स्वतः उद्धव ठाकरे वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचे दौरे करून पक्षाची ‘मोर्चे’ बांधणी करत आहे. दरम्यान, आज 12 मार्चला राळेगाव येथे दुपारी 12 वाजता, तर पुसद येथे सायंकाळी 6 वाजता ते जनसंवाद मेळावा घेणार आहे. या दोन्ही ठिकाणच्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. पुसद येथील विठाबाई नगर वाशिम रोड येथे मोठा सभा मंडप उभारण्यात आलाय. या मेळाव्याला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती राहणार असून, गेली अनेक वर्ष ज्यांना पक्षाने खासदारकी, आमदारकी आणि मंत्रिपद दिले. त्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी तसेच सर्व कार्यकर्ता आणी पदाधिकारी यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी हा दौरा असल्याचे मत उबाठा गटाचे नेते संजय देशमुख यांनी बोलतांना व्यक्त केले आहे. 


पंतप्रधान, मुख्यमंत्री पाठोपाठ उद्धव ठाकरे दोन दिवसीय दौऱ्यात


गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या 28 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनंतर 4 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वाशिमला भेट देत  (Washim) स्थानिक खासदार भावना गवळी यांच्या पुढाकाराने शहरात होत असलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन केले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेतील 84 आजी-माजी सरपंच, नगर सेवक, पंचायत समिती सदस्य आणि  जिल्हा परिषद सदस्य उबाठा गटातून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक राजकारणात उबाठा गटाला हा मोठा धक्का मानला जातोय. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाने देखील आपली कंबर कसली असून स्वतः उद्धव ठाकरे यांनी मैदानात उतरून आपली जोरदार तयारी केल्याचे बघायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या :