कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही, असा आरोप केला होता. राजेंनी माघार घेतल्यानंतर शिवसेनेवर टीका होऊ लागल्यानंतर आता शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरमधून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपती आणि आमचा विषय आहे, इतरांनी त्यामध्ये चोंबडेपणा करू नये, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.


आमच्यासाठी संभाजीराजेंच्या उमेदवारीचा विषय संपल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी राजेंच्या उमेदवारीवरून होत असलेल्या टीकेवरून भाजपला चांगलेच फटकारले. ते म्हणाले की,  या राज्यात विरोधी पक्ष आहे पण ते विरोधासाठी विरोध करताना दिसत आहे. एखादा निर्णय घेतला की त्यावर टीका करायची हे त्यांनी ठरवलं आहे. यातून त्यांना कोणता असुरी आनंद मिळतो काय माहीत नाही, पण त्याची पर्वा न करता महाविकास आघाडी ठामपणे पुढे चालली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते.


संजय राऊतांचा संभाजीराजेंना टोला  


मुख्यमंत्र्यांना आरोपाच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्या राजेंनाही संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणाच्या मालकीचे नाहीत. महाराज संपूर्ण विश्वाचे आहेत. 42 मतांचा प्रश्न होता, राजकारण करत असताना कोणत्या ना कोणत्या पक्षाचा हात धरावा लागतो. यापूर्वी पक्षप्रवेश केलेला नाही का ? अशी विचारणा करत आम्हाला तोंड उघडायला भाग पाडू नका, असे राऊत म्हणाले. संभाजीराजे यांनी काल मन मोकळं केलं, आता आमच्यासाठी हा विषय संपल्याचे ते म्हणाले. 


गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जरा हॉट झालं आहे


कोल्हापुरात शिवसंपर्क मोहिमेसाठी आलो आहे, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जरा हॉट झालं आहे. माझा हा दौरा पूर्णपणे संघटनेच्या बांधणीसाठी आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या ज्या सुचना आहेत त्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवणे हा उद्देश आहे. 2024 सालच्या निवडणुकीसाठी शिवसैनिक तयार असला पाहिजे यासाठी हा उपक्रम असल्याचे राऊत यांनी सांगितले. 


कार्डिलिय ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाला क्लीन चिट मिळाल्याने संजय राऊत यांनी नवाब मलिक यांचे अभिनंदन केले. राष्ट्रवादीनं अभिनंदन केलं की नाही माहीत नाही. मलिक यांनी हा सगळा गौप्यस्फोट बाहेर काढला असल्याचे ते म्हणाले. 


हे ही वाचलं का ?