दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.



1. हनुमानाचं जन्मस्थान अंजनेरी नव्हे तर किष्किंदा, वाल्मिकींच्या रामायणातील दाखल्यावर बोट ठेवत किष्किंदाच्या मठाधिपतींचा दावा, नाशकातल्या साधू-महंतांमध्येही मतमतांतरं


2. 36 दिवसांनी विदर्भात परतणाऱ्या राणा दाम्पत्याला नागपुरात हनुमान चालिसा पठणाची परवानगी, राष्ट्रवादीही हनुमान चालिसा पठण करणार असल्यानं वादाची शक्यता


3. पंकजा मुंडे सर्व पदांसाठी सक्षम, राज्यसभेच्या तिसऱ्या जागेबाबत फडणवीसांचं सूचक वक्तव्य, तर संभाजीराजेंची कोंडी झाल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांवर निशाणा


4. मुंबईतल्या रंगशारदामध्ये राज ठाकरे मनसैनिकांशी संवाद साधणार, तर भिवंडीमध्ये असदिद्दीन ओवैसींची सभा, दोन्ही नेत्यांच्या घोषणेकडे लक्ष


5. समीर वानखेंडेंच्या अडचणी वाढल्या, चुकीच्या पद्धतीने तपास केल्याबद्दल केंद्र सरकार करणार कडक कारवाई


6. रत्नागिरीतल्या राजवाडी, वाडा पाणेरी गावात उत्खननाला सुरुवात, रिफायनरीसाठी उत्खनन होत असल्याच्या संशयापोटी ग्रामस्थांचा विरोध


Konkan Refinary : कोकणातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध सुरू असताना दुसरीकडे काही ठिकाणी उत्खनन होत असल्याचे समोर आले आहे.  रिफायनरीला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आता या उत्खननाच्या प्रकारामुळे कोकणात रिफायनरी विरोधकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आता या मुद्यावरून रिफायनरी समर्थक आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. कोकणातील रिफायनरीला होत असलेला मोठ्या प्रमाणावरील विरोध काही लपून राहिलेला नाही. पण, सध्या रिफायनरीविरोधक आणि रिफायनरीवरून होणाऱ्या वादात आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. वाडा पाणेरी या गावात मागील काही दिवसांपासून जमिनीचं उत्खनन केले जात आहे. त्याठिकाणी मातीचे परिक्षण केले जात आहे. हे उत्खनन किंवा माती परिक्षण रिफायनरीच्या कंपनीकडून होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. 
 
ग्रामस्थ आणि रिफायनरीविरोधी संघटना यांनी याबाबतची तक्रार तहसिलदारांकडे केली आहे. मात्र, रिफायनरीचा अध्यादेश निघालेला नसताना किंवा जमीन अधिग्रहण झालेलं नसताना होत असलेलं उत्खनन नेमकं कोण करतंय असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्याशिवाय, कंपनीकडून सदरचं उत्खनन होत आहे का? कंपनीकडून ते उत्खनन होत असल्यास ते कोणत्या अधिकाराखाली होत आहे? स्थानिकांना अंधारात ठेवण्याचा उद्देश काय? याबाबत स्थानिक प्रशासनाला देखील कल्पना नसणे याचा अर्थ काय? यासारखे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत.  कोकणातील रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. रिफायनरीला अनेकदा स्थानिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून विरोध केला आहे. आता या माती परीक्षण अथवा माती उत्खननाचा प्रकार आल्याने आगामी काळात वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. रिफायनरीला होत असलेला विरोध दर्शवण्यासाठी विरोधकांनी राजापूर येथे मोर्चा देखील काढला होता. यावेळी तहसीलदारांना निवेदन देखील दिलं होतं. शिवाय, धोपेश्वर ग्रामपंचायतीमध्येही रिफायनरीविरोधातील ठराव करण्यात आला होता. त्यामुळे रिफायनरीचं भवितव्य नेमकं काय? याची चर्चा सुरु आहे. तर, शिवसेनेमध्ये रिफायनरीच्या मुद्यावर मतप्रवाह असल्याचे दिसत आहे. तर, भाजपने रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. 




7. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट महिन्यानंतर वाहतुकीसाठी खुला, घाटातील रुंदीकरणाची किरकोळ कामे सुरुच राहणार



8. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय 30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्या होणार नाही, शासन निर्णय जारी 


9.लडाखमध्ये भारतीय लष्कराचं वाहन नदीत कोसळलं,  अपघात 7 जवानांचा मृत्यू, कोल्हापूर आणि साताऱ्यानं वीर गमावले


10 . बंगळुरुला पराभूत करून राजस्थान रॉयल्सची आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक, उद्या गुजरात टायटन्ससोबत महामुकाबला