Shirdi Sai Baba Mandir Protest Update : शिर्डीतील साई मंदिरात (Sai Mandir Shirdi) फुल-प्रसादावरील बंदी उठवण्याच्या मागणीवरुन विक्रेते आक्रमक झाले आहेत. शिर्डी ग्रामस्थांसह विक्रेत्यांनी हार-फुले मंदिरात नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संस्थानचे सुरक्षारक्षक आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. कोरोना काळात शिर्डीच्या साई मंदिरात हार, फुलं, प्रसाद नेण्यावर घालण्यात आलेली बंदी अद्यापही कायम आहे. मात्र या निर्णयाविरोधात आता सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आंदोलन सुरु केलं आहे. आज सकाळी ते साई मंदिरात हार फुलं घेऊन प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संस्थानचे सुरक्षारक्षक आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. 


कायदा सुव्यवस्थेचं कारण देत संस्थाननं आंदोलन न करण्याची त्यांना विनंती केली होती. संस्थानच्या या बंदीमुळे मंदिराच्या आजूबाजूला फुलं, प्रसादाचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचं मोठं नुकसान होत आहे शिवाय साई-भक्तांनीही नाराजी व्यक्त केली आहे


साई मंदिरात हार फुले आणि प्रसाद नेण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव ते शिर्डी पायी येत द्वारकामाई समोर आंदोलन केले. शुक्रवारी म्हणजे उद्या पुन्हा साई मंदिरात हार फुले आणि प्रसाद घेऊन जाणार असल्याचे निवेदन संस्थानला दिले होते. यावर साईबाबा संस्थानने कोणत्याही पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचं कारण देत आंदोलन करू नये असं पत्र संजय काळे यांना दिलं असलं तरी त्यांनी सुद्धा पत्राला पत्राचे उत्तर देत आंदोलनावर ठाम असल्याच स्पष्ट केलं होतं. विश्वस्त मंडळाला कोणतंही आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा मज्जाव असताना हा निर्णय कसा लागू करण्यात आला असा सवाल पत्रातून विचारला आहे.  


फुलांवरील बंदीमुळं शेतकऱ्यांचंही नुकसान


कोरोना आल्यापासून जी फुलांवर बंदी आली, ती उठलीच नाही. यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ लागलं आहे. शेतातच फुले सडू लागली आहेत आणि इकडे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढू लागला आहे. शिर्डी परिसरात जवळपास 500 शेतकरी फुल शेती करतात. शिर्डीत रोज सुमारे 15 लाख रुपयांची उलाढाल होते. जवळपास 300 फुल विक्रेते आहेत. आणि या व्यवसायावर 2 हजारांपेक्षाही जास्त लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. ऑक्टोबर 2021 पासून ऑगस्ट 2022 पर्यंत  दहा महिने फुल हारावर बंदी घालण्यात आली होती.


इतर महत्वाच्या बातम्या