रत्नागिरी : कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी/त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे. सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. या मंदीरात सर्व गावकरी एकत्रित येऊन, पुढील नऊ दिवसांच्या कार्यक्रमाचे नियोजन करतात. त्यानंतर ग्रामदेवतेच्या मंदीरातून ढोळांच्या गजरात देवीच्या नावाने बोंबा म्हणजेच फाक मारतात. बाजरपेठेतुन एक फेरी मारुन ग्रामदैवतेच्या सहानेवर सर्व एकत्र येतात. तिथे देवाची पहिली होळी मानकऱ्याच्या हस्ते पेटवली जाते. नंतर गावातील वाडीतील होळ्या पेटवायला सुरुवात होते. असा हा नऊ दिवस कार्यक्रम सुरु राहतो. 


पालखी सजवून ढोल-ताशा च्या गजरात साहणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी. त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरु होतो. त्यानंतर रात्री आंब्याच्या किंवा ताडाच्या झाडाची होळी तोडून आणणे. हे काम खूप जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. सुमारे 50-70 फूट उंचीचे शेवरीचे झाड तोडून (माड) ते गावकरी खांद्यावरून नाचवत साहणेवर पालखीसामोर आणून उभे करतात. हे सगळे होईपर्यंत पहाटेचे 4 वाजतात. मग होम केला जातो. ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट शिल्लक असतो, तो एक मोठा खड्डा खणून त्यात उभा करतात. आणि त्याभोवती गवत रचून मग पालखी प्रदक्षिणा होते आणि मग होम पेटवला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात. तो एक महत्त्वाचा विधी असतो.


 



शिमगोत्सव (रत्नागिरी)


होम झाल्यावर रात्रभर दमलेले सगळे गावकरी, चाकरमानी घरी जातात. मग थोडेसे झोपून/आंघोळ-देवपूजा उरकून परत सहाणेवर जमतात आणि होळीच्या शेंड्याखाली सगळं गाव उभा राहून गार्‍हाणे नावाचा कार्यक्रम होतो. ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक (गावची सभा) असते. ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते. त्यानंतर तिसर्‍या दिवशी काही ठिकाणी पालखीने खुणा काढणे हा कार्यक्रम असतो. यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो. तो नारळ पालखी हुडकून काढते. हा कार्यक्रम देखील पाहण्यासारखा असतो. 


चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावचा शिमगोत्सव अनोखा असतो. इथे नवव्या दिवशी ग्रामदैवतेच्या जागेत मैदानावर ग्रामस्थ दोन गटात रात्री विभागून ग्रामस्थ दुतर्फा उभे राहून एकमेकांवर जळती लाकडे ग्रामदैवतेच्या नावाने बोंबा मारून एकमेकांवर फेकतात. हा कार्यक्रम बघण्यासाठी महाराष्ट्रातून अनेकजण येतात. दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा आणि भजन, तसेच रात्री गावचे खेळे-नमन हा लोकनृत्यप्रकार असतो. काही ठिकाणी पालखीनृत्य स्पर्धा ही असतात. त्यानंतर पुढील दिवसांत पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या गोंधळ घालून होते.


तर असा आहे कोकणचा शिमगोत्सव! मंडळी, गावकरी आणि चाकरमानी यांच्या साथीने कोकणची संस्कृती अनुभवायला एकदा तरी शिमग्याला कोकणात याच!