पंढरपूर: उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची ताकद आमच्यापेक्षा जास्त पडली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिली. ते पंढरपुरात बोलत होते.


पवार म्हणाले, “उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेत निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांची ताकद भारी पडली.”

पंतप्रधानपदाबाबत

यावेळी शरद पवारांनी पंतप्रधानपदाबाबतच्या प्रश्नावरुन गुगली टाकली. 2019 च्या लोकसभा निवडणुका झाल्यावर सर्व राज्यातील आघाड्यांमधून निवडून येणारे खासदार नेता ठरवतील, असं पवार म्हणाले.

सेनेला निमंत्रण नाही

शिवसेनेला निमंत्रण देण्याचा प्रश्नच नाही. सर्व भाजपविरोधकांनी एकत्र येण्याची भूमिका मांडली आहे. निवडणुका जाहीर होताच या चर्चा होतील असे पवार यांनी सांगितले.

मीडियाला माधुरी महत्त्वाची

माध्यमांना जनतेच्या प्रश्नापेक्षा माधुरी दीक्षितसारख्या सेलीब्रेटींच्या भेटी महत्वाच्या वाटतात, असा टोमणा पवारांनी लगावला.

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणूक

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी तब्बल 76 मतांनी विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाला आहे.

सुरेश धस यांना 527 मतं, अशोक जगदाळे यांना 451 मतं मिळाली. तर तब्बल 25 मतं बाद झाली.

धस यांचा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का आहे, तर पंकजा मुंडे यांचा मोठा विजय आहे.