पुणे : भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ''शरद पवार हे शेतकऱ्यांचे नाही, तर शेती मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग समुहाचे नेते आहेत,'' असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.


राज्यासह देशभरात विविध मागण्यांसाठी शेतकरी संप सुरु आहे. शरद पवार यांनी शेतकऱ्यांना चिथावणारं वक्तव्य केलं. दिलेली आश्वासनं पाळण्याची सरकारची नियत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

शरद पवारांच्या या वक्तव्याचा प्रकाश आंबेडकरांनी समाचार घेतला. ''शेतकरी जातीवर मतदान करत राहील तोपर्यंत आत्महत्या थांबणार नाहीत. त्याला अन्नधान्य, शेतमाल फेकण्याशिवाय पर्याय नाही. जातीसाठी किती माती खायची हे शेतकऱ्यांनी आता ठरवलं पाहिजे,'' असं आंबेडकर म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?

“सामान्य माणसाला त्रास होईल, लोकांवर आघात होईल असं काही करु नये. पण हा संघर्ष प्रश्न सुटल्याशिवाय थांबणार नाही, हा निकाल घ्यावा लागेल.  सरकारने दिलेली आश्वासन पाळली नाहीत,तशी त्यांची नियत दिसत नाही. शेतकऱ्यांनी याबाबत टोकाची भूमिका घ्यावी असं आवाहन करतो”, असं पवार म्हणाले.

मुनगंटीवार यांचं पवारांना प्रत्युत्तर

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं. ''इतके वर्षे सत्तेत असताना जनतेची कामं करता आले नाही. शेतकऱ्यांना चिथावण्यामागे पुन्हा सत्तेत जाण्याची घाई आहे असं दिसतं,'' असं म्हणत मुनगंटीवारांनी पवारांना उत्तर दिलं.

''शरद पवार राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते. देशाचे कृषीमंत्री होते तेव्हा त्यांना आत्महत्या थांबवता आल्या नाही. आमचं सरकार योग्य मार्गाने निघालं आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहे, तेव्हा आपल्याला स्वत:च्या शेतावर जावं लागेल याची भीती पवारांना वाटत असावी,'' असा टोलाही मुनगंटीवारांनी लगावला.