धुळे: पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या गावांमध्ये मान्सूनपूर्व पावसातच सकारात्मक परिणाम दिसत आहेत.


धुळे जिल्ह्यातील लामकानी इथं गावकऱ्यांनी बांधलेल्या बंधारे मान्सूनपूर्व पावसातच तुडुंब होत आहेत.

दोन जूनच्या रात्री धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या वादळी पावसाने दाणादाण उडवली. तर दुसरीकडे लोकसहभागातून, श्रमदानाने ग्रामस्थांनी बांधलेले बंधारे जलमय झाल्याने, ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला.



दरम्यान, या पावसाने धुळे शहराच्या 25 टक्के भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाणे तलावाच्या जलसाठ्यात दोन दशलक्ष घनफूट इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे हे पाणी धुळे शहराच्या 25 टक्के भागाला जुलैअखेरपर्यंत पुरु शकेल, असा विश्वास पाटबंधारे विभागाने व्यक्त केला.



धुळे शहराच्या उर्वरित 75 टक्के भागाला तापी नदीतून पाणी पुरवठा होतो. सद्य स्थितीत तापी नदीत मुबलक जलसाठा असल्यानं, धुळे शहरात पाणी टंचाईची स्थिती नसल्याचा दावा महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आला आहे.