Rajesh Tope : राज्यातील सार्वजनिक रुग्णालये आणि मेडिकल कॉलेजमध्ये तृतीय पंथीयांच्या उपचारासाठी स्वतंत्र बेड्स आणि वार्ड आरक्षित होणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. तृतीय पंथीयांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात आज झालेल्या बैठकी नंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सबंधीत यंत्रणेला याबाबत धोरण ठरवण्याच्या सूचना दिल्या आहेत.  


तृतीय पंथीयांच्या संघटनांकडून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना याबाबत विनंती करण्यात आली होती. त्यावेळी हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू असे आश्वासन मंत्री टोपे यांनी संघटनांना दिले होते. त्यानुसार आरोग्यमंत्री टोपे यांनी याबाबतचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. 


राज्यातील तृतीयपंथी नागरिकांना उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी यापुढे हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र बेड्स आणि वार्ड आरक्षित असावेत यासाठी आरोग्यविभागाच्या वतीने एक निर्णय घेण्यात येणार आहे. त्या संबंधीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत. यासाठी मेडिकल कॉलेज आणि सार्वजनिक रुग्णालयांना कायद्यानुसार या बाबतीत धोरण ठरवण्याच्या देखील सूचना करण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. 


"ट्रान्सजेण्डर नागरिक हे आपल्या समाजाचाच एक भाग आहेत. त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता आले पाहिजे, या मताचा मी आहे. ट्रान्सजेंडर नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयात बैठक झाली. बैठकीत ट्रान्सजेंडर नागरिकांच्या आरोग्य समस्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. ट्रान्सजेंडर नागरिकांना लिंग बदल शस्त्रक्रिया, लेसर आणि संप्रेरक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे त्यासाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना दिल्या आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. 


दरम्यान, तृतीय पंथीयांच्या आरोग्य सेवेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार असल्याचे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिले होते. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या आत आरोग्यमंत्र्यांनी तृतीय पंथीयांच्या आरोग्य सेवेचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे तृतीय पंथीयांकडून राजेश टोपे यांचे आभार मानण्यात आले आहेत.  


महत्वाच्या बातम्या