सांगली: स्वत:च्या हातांनी डोंगर फोडून रस्ता बनवणाऱ्या दशरथ मांझींच्या कर्तृत्त्वाला देशाने सलाम केला. तसंच कर्तृत्व वाशिममधल्या एका बहादराने करुन दाखवलं. बापूराव ताजणे यांनी एकट्याने विहीर खोदली. आता इकडे सांगलीतही दोन जिगरबाज 'मांझी'नी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.   उत्तम पाटील, हणमंत पाटील....सांगलीच्या वाळवा तालुक्यातील रेठरेधरण गावातले हे जिगरबाज भाऊ आज अनेक शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरले आहेत. डोंगराला नमवणाऱ्या मांझीप्रमाणे या दोघांनीही कोणाचीही मदत न घेता आपल्या 43 फूट विहिरीतील तब्बल 10 फुटांचा गाळ स्वच्छ केला.
दुष्काळाला हरवण्याचा ध्यास   रेठरेधरण हे वाळवा तालुक्यातील आठ- नऊ हजार लोकवस्तीचं गाव. गावात उत्तम आणि हणमंत पाटील या दोन जिगरबाज सख्ख्या भावांचं वास्तव्य. लहानपणीच आई- वडिलांचे छत्र हरवले आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पेलत त्यांनी शेती कसायला सुरुवात केली. पाऊसमान चांगलं होतं तोपर्यंत शेतीतून उत्पन्न चांगलं झालं. मात्र  पावसाचे गणित बिघडले आणि एकमेकांच्या हातात हात घालून शेती करणाऱ्या या दोन भावांच्या संसाराचे गणितदेखील बिघडले.

संबंधित बातमी : वाशिमचा मांझी… शेजाऱ्यानं पाणी नाकारलं म्हणून ‘त्यानं’ हाताने विहीर खोदली!

हाताने खणलेल्या विहिरीचं पुनरुज्जीवन   दुष्काळानं शेती करपून गेलेली...पाण्याचा टिपूस नाही. शेतातून पायलीभर धान्य मिळाले नाही.  हाताला काम नाही. अशा परीस्थितीत या दोन बंधूसमोर संकटाचे मळभ दिसू लागले. मात्र परिस्थितीला शरण जातील आणि हातात हात घालून बसतील ते हे पाटील बंधू कसले.
अशावेळी हातावर हात धरुन बसणं यांना मान्य नव्हतं. शेतातील 1986 साली हातानेच खणलेल्या जुन्या विहिरीला पुनरुजीवित करण्याचा ध्यास घेऊन, दोघे बंधू टिकाव, खोरे घेऊन 43 फूट विहिरीत उतरले. त्यांनी विहिरीतून एक-एक पाटी गाळ काढण्यास सुरुवात केली. कोणत्याही यंत्राशिवाय, कोणाच्याही मदतीशिवाय या भावांनी आपल्या 43 फूट विहिरीतून तब्बल 10 फूटांचा गाळ काढला.   चिमुकल्या चिमणीची साथ   दोन्ही बंधू सकाळी ७ वाजल्यापासून गाळ काढायला सुरुवात करायचे. त्यांचा हा  दिनक्रम  महिनाभर सुरु होता. गाळ काढताना अनंत अडचणी येत होत्या. या कामामध्ये त्यांना सोबत होती ती एका चिमणीची.   विहिरीमध्येच घरटे असलेल्या या चिमणीला पाणी मिळत नव्हतं. या बंधूंनी विहिरीतील एका बारीक झऱ्यातून येणारे थेंब थेंब पाणी चिखलाने अडवून, ते चिमणीला मिळेल, अशी सोय केली.
आधी विहिरीत फक्त कुदळ, फावड्याचा आवाज घुमायचा. मात्र आता चिमणीचा प्रसन्न करणारा चिवचिवाट ऐकायला येऊ लागला होता. या आवाजाच्या साथीने पाटील बंधूंनी 24 दिवसात 10 फूट गाळ काढून विहीर पुनरुज्जीवित केली.   या दोन्ही जिगरबाज भावांची जिगर पाहून दुष्काळही दोन पावलं मागे हटला.

संबंधित बातम्या

वाशिमचा मांझी… शेजाऱ्यानं पाणी नाकारलं म्हणून ‘त्यानं’ हाताने विहीर खोदली!