वर्धा : शनिवारी रात्रीच्या सुमारास वर्ध्यातल्या आर्वी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील एक तरुण आणि तरुणी सहा महिन्यांपूर्वी पळून गेले होते. त्याचा राग मनात ठेऊन मुलीच्या भावाने मुलाच्या आईची हत्या केली आहे. बेबी लक्ष्मण मेंढे असं मृत महिलेचं नाव असून त्या अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील कवडगव्हाण इथल्या रहिवाशी होत्या. बेबी मेंढे मागील चार महिन्यांपासून आर्वीलगतच्या पिपरी येथे भाड्याच्या घरात राहत आहेत. या राहत्या घरीच त्यांची हत्या करण्यात आली आहे.


वर्ध्यातील गणेश काळे यांची मुलगी आणि पिपरी येथील बेबी मेंढे यांचा मुलगा सहा महिन्यांपूर्वी पळून गेले आहेत. सहा महिन्यांपासून दोन्ही मुलांचा थांगपत्ता नाही. शनिवारी सायंकाळी गणेश काळे, त्यांचा मुलगा उमेश काळे आणि अन्य एक नातलग बेबी मेंढे यांच्याकडे पाहुणे म्हणून आले. झालं-गेलं सर्व विसरून जा, असं म्हणत त्यांनी बेबी मेंढे यांच्याकडे चहा-नाश्ता केला.

काळे पिता-पुत्र आणि बेबी मेंढे यांच्यात बराच वेळ बोलणे झाले. चहा-नाश्त्यानंतर उमेश काळे (पळून गेलेल्या मुलीचा भाऊ)याने बेबी मेंढे यांना विचारले की, "तुमचा मुलगा आणि माझी बहीण कुठे आहेत?" यावर मेंढे यांनी मला काहीच माहीत नाही असे सांगितले.

मेंढे यांच्या नकारार्थी उत्तराने उमेश संतापला, "तुम्हाला माहिती असूनही तुम्ही सांगत नाही", असे म्हणत त्याने धारदार शस्त्राने बेबी मेंढे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मेंढे गंभीर जखमी झाल्या. जखमी मेंढे यांना अमरावतीला उपचारासाठी नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मेंढे यांच्या शेजाऱ्यांनी गणेश काळेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी उमेश काळे आणि त्यांच्या आणखी एका नातलगाला पकडले आहे.