परभणी : साईबाबा यांच्या जन्मस्थळावरुन सुरु झालेल्या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (20 जानेवारी) शिर्डी येथील शिष्टमंडळाशी चर्चा केली आणि त्यात तीर्थक्षेत्र म्हणून पाथरीचा विकास करु असे आश्वासन दिल्याचे शिर्डीकरांनी सांगितलं. त्यामुळे त्यांचे समाधान जरी झाले असले तरी आज पाथरीकर आपली भूमिका ठरवणार आहेत. पाथरीमधील साई मंदिरात आज दुपारी बारा वाजता महाआरतीचं आयोजन करण्यात आले आहे. या महाआरतीला जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि सर्व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अद्यापही पाथरीकरांना चर्चेचे निमंत्रण न दिल्यामुळे पाथरीकर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.


साईबाबांच्या जन्मस्थळ वादासंदर्भात शिर्डीचं शिष्टमंडळ, स्थानिक लोकप्रतिनिधी, यांची काल सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. पाथरी साई जन्मस्थळ विकास आराखडा या नावातून साई जन्मस्थळ उल्लेख काढून टाकल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय, अशी माहिती शिर्डीचे सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली. मात्र मुख्यमंत्र्यांनी 'पाथरी साईंचं जन्मस्थळ' हा उल्लेख मागे घेतल्याचा दावा पाथरीकरांना अमान्य आहे. त्यामुळे साईबाबांच्या जन्मस्थळावरच्या वादावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याचं समजतं.

जगाला 'सबका मालिक एक'चा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचं जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातलं पाथरी की नगर जिल्ह्यातलं शिर्डी असा वाद सध्या सुरु आहे. या वादामुळे दोन दिवसांपूर्वी शिर्डी बंद आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनात 30 गावांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारत पाथरी साईबाबांचं जन्मस्थान असल्याचं संबोधत या परिसराच्या विकासासाठी 100 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा शिर्डीकरांनी जोरदार विरोध करत बंद पुकारला होता.

काय आहे पाथरीकरांचा दावा?
पाथरीकरांनी दावा केला आहे की, साई संस्थानने 1994 ला प्रकाशित केलेल्या हिंदी साईचरित्रामध्ये साई बाबांचा जन्म हा पाथरी येथील आहे. मात्र हा उल्लेख पाथर्डी नावाने करण्यात आला आहे. संत दासगणू महाराज यांनी त्यांच्या ओवीमध्ये भगवना श्रीकृष्णाचा जन्म जसा मथुरेत झाला आणि ते गोकुळात आले तसाच साईबाबांचा जन्म पाथरीत झाला आणि ते शिर्डीत गोकुळाप्रमाणेच आले असे सांगितलं आहे. पण शिर्डीकरांचा या दाव्याला विरोध आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत दावा करताना पाथरीकरांनी साईचरित्राच्या आठव्या आवृत्तीचा देखील दाखला दिला आहे. ज्या आठव्या आवृत्तीचा दाखला देत पाथरीकर साईबाबांच्या जन्मस्थळाचा दावा करीत आहेत, ती स्थळप्रत शिर्डी संस्थानच्या दप्तरांतूनच गायब असल्याचे निष्पन्न झाले आहे.

परभणीच्या गॅझेटमध्ये साईबाबांची नोंद
1967 साली भारत सरकारच्या गॅझेटियर विभागाने परभणी जिल्ह्याचे गॅझेट प्रकाशित केले होते ज्याच्या आधारावर,अनेक संशोधन साहित्याचा अभ्यास करुन मराठीतून स्वतंत्र गॅझेट हे 15 सप्टेंबर 1988 रोजी काढण्यात आले. या गॅझेटमध्ये पाथरीचा उल्लेख पूर्वी पार्थपुरी होता. कालांतराने अपभ्रंश होऊन पाथरी झाला. याच गॅझेटनुसार काहींच्या मते पाथरी हे संत साई बाबांचे जन्म गाव असावे. महत्त्वाचं म्हणजे भुसारी कुटुंबात जन्म घेतलेले साई सेलूला गेले होते. तिथे त्यांना वेडा समजून हाकलून लावलं. त्यांना दगड मारल्यामुळे कपाळाला खोक पडली. त्यामुळेच साईबाबांना बाबासाहेब नावाच्या संतांनी कपाळावर पट्टी बांधली. ही पट्टी त्यांच्या कपाळावर कायमच राहिली. तेव्हापासून बाबासाहेबांना साईबाबांनी आपले गुरु मानले.

संबंधित बातम्या

Sai Baba Birth Place Conflict | मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शिर्डीकरांचं समाधान, बेमुदत आंदोलनही मागे

साईंच्या जन्मस्थळावरील वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक; पाथरीकरांना निमंत्रण 

Shirdi Saibaba | साई जन्मस्थळाच्या वादानंतर भक्तांची गर्दी दुप्पट, राज्यासह देशातील भक्तांच्या 

Shirdi Bandh | साई जन्मस्थळ वादाप्रकरणी चर्चेतून तोडगा काढू : अजित पवार