मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता, व्यथित होऊन जीवन संपवायला आलेल्या शेतकऱ्याला नवी उमेद
एबीपी माझा, वेब टीम | 20 Jan 2020 11:40 PM (IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रशासनात येउन काहीच दिवस झाले आहेत. काही दिवसातच त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेत आपली एक वेगळी छाप पाडली आहे. त्यांनी आज आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत नांदेडच्या शेतकऱ्याला दिला.
मुंबई : काल परवा सांगलीमध्ये तहसीलदारांना त्यांच्या खुर्चीत विराजमान करुन स्वत: कडेला उभे राहणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आणखी आपल्या वेगळेपणाचा परिचय दिला आहे. आपल्या व्यस्ततेत देखील एका व्यथित शेतकऱ्याची समस्या ऐकूण घेत त्याला नवी उमेद दिली. ठाकरे यांनी शपथविधीनंतर मोठ्या व्यग्र दैनंदिनीत एका शेतकऱ्याच्या व्यथेची दखल घेतली होती. व्यथित होऊन जीवन संपविण्याच्या तयारीने मुंबईत दाखल झालेले नांदेड जिल्ह्यातील धनाजी जाधव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शब्दांमुळे नवी उमेद घेऊन परतले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आत्मियतेने दखल घेतलेल्या या शेतकऱ्यांची गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. जमिनीच्या सातबारावर नोंदी अद्ययावत झाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जमिनीवरील कर्ज नोंदीमुळे फेरफार न झाल्याने जाधव यांचा मोठा व्यवहार अडला होता. त्यावर त्यांनी मुंबईत येऊन आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटण्याची संधी मिळाली. जाधव यांनी आपल्या जमिनीचा व्यवहार आणि कर्ज याबाबत माहिती दिली. त्याही व्यग्रतेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवेदनशीलतेने परिस्थिती जाणून घेतली. जाधव यांना निराश होऊ नये, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वस्त केले. तसेच त्यांनी संबंधित यंत्रणा आणि महसूल अधिकारी यांना निर्देश दिले. संबंधित बातम्या