Chhagan Bhujbal : राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा निर्णायक टप्प्यावर पोहोचल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या विरोधात कोणताही नेता बोलण्यास तयार होत नसताना अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मात्र ओबीसीमध्ये (OBC) मराठ्यांचा समावेश होऊ देणार नाही, असे म्हणत आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांनी प्रत्युत्तर सभाही घेतल्या. त्यामुळे महायुतीमध्ये नाराजी पसरली होती. मनोज जरांगे पाटील यांच्यावरही एकेरी भाषेत कडाडून हल्ला चढवला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळांकडून ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्यावर तुटून पडले होते त्याच पद्धतीने आता महायुतीमधील निर्णयाने स्वकीयांवरच तुटून पडले आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


महायुतीच्या विरोधात भुजबळांची थेट भूमिका


गेल्या काही दिवसांपासून भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये नाशिकमधून ते इच्छुक होते. त्यांनी स्वतःसाठी किंवा पुतण्यासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र, मराठा आंदोलनाचा धसका घेत त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला होता. शिंदे गटाने जागा न सोडल्याने त्यांचा पत्ताच कट करण्यात आला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून झालेल्या घडामोडी पाहिल्या असता भुजबळ यांनी सातत्याने महायुतीच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. घाटकोपरमध्ये घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरु होत्या. मात्र, भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या मदतीला धावताना सरकार, पालिका आमची मग उद्धव ठाकरेंचा काय संबंध म्हणत जाहीर पाठराखण केली होती. आता वादग्रस्त मनुस्मृतीचा उल्लेख अभ्यासक्रमामध्ये करण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडच्या चवदार तळ्यावर जात आंदोलन केलं होतं. मात्र, याठिकाणी अनावधानाने आंबेडकर यांचे पोस्टर फाडण्यात आल्यानंतर जितेंद्र आवड टिकेचे धनी ठरले आहेत. 


विधानसभेच्या जागांवरून आताच वाद सुरु


त्यांच्या विरोधात आंदोलन केली जात आहेत. मात्र, त्यांची सुद्धा पाठराखण करण्याचे काम छगन भुजबळ यांनी केल्याने महायुतीच्या विरोधाची हवा कमी झाली आहे. समता परिषदेनंही आंदोलन केल्याने विरोधाची तीव्रता कमी  झाली. त्यामुळे सुद्धा राजकीय भूवया उंचावल्या गेल्या. पाठराखण करण्याचा कार्यक्रम सुरु असतानाच राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये सुद्धा भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. लोकसभेच्या मिळालेल्या कमी जागांचा संदर्भ देत विधानसभेला कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही हे आत्ताच ठणकावून सांगा, असा आक्रमक पवित्रा भुजबळ यांनी घेतला होता. 


या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ हे कोणता मोठा निर्णय घेण्याची तयारीत आहेत का? अशी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे दबावतंत्र करून भुजबळ प्रयत्नशील आहेत का? याची सुद्धा चर्चा आहे. मात्र, याबाबत अजून कोणतीही स्पष्ट अजित पवार गटाकडून देण्यात आलेली नाही. या संदर्भाने मंत्री हसन मुश्रीफ यांना सुद्धा विचारण्यात आलं होतं. मात्र, हसन मुश्रीफ यांनी याबाबतचा निर्णय अजितदादा घेणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचा निर्णय महाविकास आघाडीच्या बाजूने गेल्यास भुजबळ हे पुन्हा एकदा आपली राजकीय कूस बदलू शकतात का? अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. 


लोकसभेला अवघ्या चार जागा वाट्याला आल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आतापासूनच तयारी केली आहे. छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीमधील खदखद बाहेर आली आहे का? अशीही चर्चा रंगली आहे. भुजबळ यांनी 80 ते 90 पेक्षा कमी विधानसभा जागांवर समाधान मानणार नाही. माझ्या पक्षासाठी मी बोलणारच असे म्हणत त्यांनी इरादा स्पष्ट केल्याने सुद्धा भूवया उंचावल्या आहेत. त्यामुळे भुजबळांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. 


टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना प्रत्युत्तर


यानंतर भुजबळ यांनी टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मी माझ्या पक्षातच बोलणार’, असे भुजबळ यांनी भाजप नेत्यांना कडक शब्दात सुनावले आहे. "मी माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीत जागावाटपाचा मुद्दा उपस्थित केला होता. मी सध्या मीडियाशी बोलणार नाही. मला जे काही बोलायचे आहे ते मी पक्षाला सांगेन. मी त्यांना फक्त आठवण करून दिली. जे महायुतीत येताना म्हणाले होते.


आम्हाला आमचा हक्काचा वाटा मिळाला पाहिजे 


ते पुढे म्हणाले की, तुम्ही तुमच्या पक्षात बोलता तेव्हा आम्ही कुठे बोलतो? तुमच्या पक्षात बोलणे हा तुमचा अधिकार आहे. तसेच, मला माझ्या पक्षात काय म्हणायचे आहे, हा माझा अधिकार आहे. हा अधिकार प्रत्येकाने स्वीकारला पाहिजे. चर्चेतून निर्णय घेतला जाईल असेही छगन भुजबळ म्हणाले. लोकसभा निवडणुकांप्रमाणे विधानसभेच्या जागावाटपात कोणताही वाद होता कामा नये. आम्हाला आमचा हक्काचा वाटा मिळाला पाहिजे, असे भुजबळ म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून गदारोळ होताच छगन भुजबळ यांनी यू-टर्न घेतला. माझ्या वक्तव्याबद्दल महायुतीला वाईट वाटण्याचे कारण नाही. भाजप आमचा मोठा भाऊ आहे. त्यामुळे त्यांना जास्त जागा मिळतील. इतर दोन पक्षांना चांगल्या जागा मिळतील, असा निष्कर्ष छगन भुजबळ यांनी काढला.


उद्धव ठाकरें पवारांना सहानुभूतीची लाट


विशेष म्हणजे विधानसभेच्या जागावाटपावरून आताच ठिणगी टाकतानाच भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना पक्ष फुटल्याने सहानुभूतीची लाट असल्याचे म्हटले होते. भाजपच्या 400 पार नाऱ्यावरही त्यांनी टीका केली होती. 'अब की बार 400 पार' घोषणेमुळे घटनेमध्ये बदल केला जाणार असल्याची भावना मतदारांमध्ये झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आणि शरद पवार यांनाही सहानुभूती आहे, त्यामुळे मागील दोन निवडणुकीत ज्यापद्धतीने त्यांनी कामगिरी केली त्यापद्धतीने कामगिरी करण्यात मागे पडतील असे वाटत नसल्याचेही त्यांनी म्हटले होते.  


इतर महत्वाच्या बातम्या