नागपूर: ‘राजीनामे नुसते खिशात ठेऊन चालत नाही तर ते द्यावे लागतात.’ असा खोचक सल्ला संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो वैद्य यांनी शिवसेनेला दिला आहे.


विशेष म्हणजे शिवसेना नेत्यांनी राजीनामे दिल्यास शिवसेनेतच फूट पडेल असं भाकितही त्यांनी वर्तवलं आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषक राहिलेल्या मा.गो वैद्यंचं भाकित आगामी काळात किती खरं ठरतं हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

‘लढायचं म्हटलं की, कठोर शब्दांचा वापर होतोच’

‘नगरपरिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये शिवसेना-भाजपचं एकमत नाही. त्यामुळे ते परस्परात लढणार. लढायचं म्हटलं की, कठोर आणि अनुचित शब्दांचा वापर होतो. प्रत्येकाची संस्कृती असते. त्यानुसार ते शब्द वापरतात.’ असं मा. गो. वैद्य म्हणाले.

‘राजीनामे खिशात ठेऊन चालत नाही, द्यावे लागतात’

‘राजीनाम्याच्या बाबतीत असं आहे की, ते राजीनामे देतील असं मला वाटत नाही. राजीनामे खिशात ठेऊन चालत नाही. ते दिले पाहिजे. असं वाटलं होतं की, काल ते राजीनामे देतील. पण त्यांनी दिलेले नाही. त्यांच्या खिशातच आहेत अजूनही. माझा तर्क असा आहे की, त्याला काही प्रमाण नाही. पण मला असं वाटतं जर मंत्र्यांनी राजीनामे दिले तर शिवसेनेमध्येच फूट पडेल.’  असं भाकितही वैद्य यांनी केलं.

‘महापालिका निकालानंतर राज्यातील सत्तेचं चित्र स्पष्ट होईल’

‘शिवसेनेला केद्रांत काही मिळालेलं आहे, राज्य सरकारमध्येही त्यांचे काही मंत्री आहेत. त्यांना काही चांगली खातीही मिळाली आहेत. त्यांचे काही मंत्री देसाई वैगरे हे चांगलं कामंही करत आहेत. त्यामुळे तसा काही धोका नाही. त्यांनी राजीनामे दिलेच तर निवडणुका घेण्याचा प्रसंग येईल. या निवडणुकांना सामोरं जाण्याची त्यांची तयारी आहे का? असा सवालही वैद्य यांनी उपस्थित केला. पण तसेच राज्यातील सत्तेबाबतचं चित्र हे महानगरपालिकेचे निकाल लागल्यावरच स्पष्ट होईल. असाही त्यांनी अंदाज वर्तवला.

संबंधित बातम्या: