Nitin Gadkari On Bogus Work : छत्रपती संभाजीनगर ते पैठण या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. तर रविवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या कामाची पाहणी केली. दरम्यान, यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्याच्या कामात गरबड झाल्यास मला कळवावे, त्याला रगडून टाकायचे काम मी करेल असे गडकरी म्हणाले. पैठण येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत ते बोलत होते. 


काय म्हणाले गडकरी? 


छत्रपती संभाजीनगर-पैठण रस्त्याच्या कामावर पत्रकारांनी लक्ष ठेवावे, काहीही गरबड झाल्यास मला कळवावे. संबंधित कंत्राटदारावर आमच्याकडून कडक कारवाई करण्यात येईल. कोणी किती रुपायत टेंडर घ्यायचा हे नाही, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी आतापर्यंत 50 लाख कोटी रुपयांची कामे केली आहेत. एकही ठेकेदार माझ्या घरी येत नाही. आमच्याकडे भ्रष्टाचार होत नाही, स्पर्धा होते. त्यामुळे पैठण रस्त्याचे काम ज्याने 41 टक्के घेतलं त्याच्या कामावर दुर्बीण घालून लक्ष ठेवा. त्याने कुठेही गरबड केली तर मला सांगा, रगडून टाकायचे काम मी करेल. तसेच त्याला रस्ता दुरुस्त करायला लावेल. पण कोणी किती टक्क्यांनी कामे घ्यावे याला थांबू शकत नाही. 


महामार्गांवरील वेग वाढवणार...


दरम्यान, देशातील द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवरील वाहनांची वेगमर्यादा वरून राज्य आणि केंद्रात समन्वय नसल्याच्या प्रश्नाला देखील गडकरी यांनी उत्तर दिले आहे. "या विषयात केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही अधिकार आहे. यासाठी दिल्लीत रस्ते वाहतूक मंत्र्यांची बैठक बोलवण्यात आली होती.  या बैठकीत सर्वांचा सल्ला घेण्यात आला. त्यानंतर आता नवीन स्पीड अंतिम करण्यात आला आहे. या नवीन स्पीडबाबत पुढील तीन चार दिवसांत आदेश काढण्यात येणार आहे. ज्यात स्पीड वाढवण्यात आला आहे. नवीन स्पीड ठेवण्याबाबत दोन वेगवेगळी मत होती, त्यामुळे यातील समन्वय साधून स्पीड ठरवण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकारला दोन-तीन दिवसांत गॅझेट नोटिफिकेशन जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकार सुधारित गॅझेट नोटिफिकेशन काढतील, असे गडकरी म्हणाले. 


वटवृक्षांचा पाहणी...


छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. यात आतापर्यंत हजारो छोटे-मोठे झाडे तोडली गेली आहेत. ज्यात अनेक वर्षांचे वटवृक्षांचा देखील समावेश आहे. मात्र या कामात हटवण्यात आलेल्या एकूण 51 वटवृक्षांचे रुट बॅाल प्रक्रियेद्वारे पुनर्रोपण करण्यात आले आहे. ज्यामुळे कित्येक वर्षांचे वटवृक्ष जिवंत राहणार आहे. दरम्यान रविवारी पैठण दौऱ्यावर असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या रुट बॅाल प्रक्रियेद्वारे पुनर्रोपण करण्यात आलेल्या वटवृक्षांची पाहणी केली.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


संभाजीनगरमध्ये 51 वटवृक्षांचे रुट बॅाल प्रक्रियेद्वारे पुनर्रोपण; नितीन गडकरी करणार पाहणी