Ramdas Athawale : ड्रग्ज घेणाऱ्यांना तुरुंगात न टाकता व्यसनमुक्ती केंद्रात पाठवायला हवं, असं वक्तव्य केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते धुळ्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आठवले म्हणाले की, ‘आपण सिगारेट अथवा दारु पिणाऱ्यांना ज्याप्रमाणे तुरुंगात पाठवत नाही. त्याप्रमाणे ड्रग्ज घेणाऱ्यांनाही तुरुंगात न टाकता व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवायला हवं.’ मुंबईतील ड्रग्ज प्रकरणानंतर देशभरात ड्रग्जबाबात पडसाद पडत आहेत. ड्रग्जबाबत कठोर कायदा करण्यात यावा, अशी काहींनी मागणी केली आहे. याबाबतच केंद्रीय राज्य न्याय मंत्री रामदास आठवले यांना प्रश्न विचारला असताना त्य़ांनी आपलं मत व्यक्त केलं.


दोंडाईचा वरवाडे नगर परिषद येथे विविध विकास कामांच्या लोकार्पणसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले धुळे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी लोकार्पण सोहळ्या दरम्यान आठवले यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ड्रग्स घेणाऱ्याच्या विरोधात सुरू असलेला कायदा बदलण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचा देखील खुलासा यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला. आपल्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी नशामुक्ती केंद्र उपयुक्त आहे. म्हणून सध्या जो कायदा आहे ज्यात ड्रग्ज घेतलेल्याला तुरुंगात टाकलं जातं त्या कायद्यामध्ये बदल करण्याचा विचार आमचं मंत्रालय करत आहे. लवकरच त्यासंबंधीचा कायदा जर झाला तर ड्रग्ज घेणाऱ्याला तुरुंगात न पाठवात नशामुक्ती केंद्रात पाठवण्यात येईल, असं आठवले म्हणाले.


नवाब मलिकांवर साधला निशाणा -
मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणातील एनसीबीचे मुख्य तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मंत्री नवाब मलिक यांच्याकडून व्यक्तिगत होत असलेल्या आरोपांचा यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी समाचार घेतला. आठवले म्हणाले की, मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्स संदर्भात आरोप करावेत परंतु समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तिगत आरोप करू नयेत. राज्यातील सरकार हे ड्रग्सला पाठिंबा देणारं सरकार आहे. समीर वानखेडेला बदनाम करण्याचा प्रयत्न राज्य सरकार कडून सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लावला आहे.


महत्वाच्या बातम्या :