Maharashtra Winter Session : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) झालेल्या नुकसानीसाठी मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी करणार आहेत. या संबधित घोषणा ही शुक्रवारी करण्यात येणार होती. पण पंचनामे पूर्ण न झाल्याने सोमवारी घोषणा केली जाणार आहे. अवकाळी पावसावर मोठ्या पॅकेजची घोषणा करण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. 


आतापर्यंत सर्व पंचनामे पूर्ण न झाल्याने पॅकेजची घोषणा कशी करायची हा सरकारपुढे मोठा पेच आहे. त्यामुळे यासंदर्भात दोन दिवसात निर्णय घेतला जाणार असल्याचं समजतंय. 


राज्यात अवकाळी पावसाची हजेरी


जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात दिलासा देणारा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत होता. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत देखील भर पडली. विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावासने अक्षरश: झोडपून काढलं. यामुळे कापूस, भात यांसारख्या अनेक पिकांना फटका बसला. त्यातच विमा कंपनींकडून देखील कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद येत नसल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात येत होता. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. 


नागपुरात (Nagpur) सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु आहे. या अधिवेशनात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा झाली. अवकाळीग्रस्तांना सरकारने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. 


राज्यातील शेतकऱ्यांवर यंदाच्या वर्षात एकामागून एक संकट येतच गेली. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले त्यानंतर दुष्काळ, पुन्हा गारपीटीसह आलेला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याच पार्श्वभूमीवर 75 टक्क्यांपेक्षा अधिक भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती असली तरीही अनेक भागात शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यास शासनाकडून विलंब होत असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहेत. दरम्यान या मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं. त्याचप्रमाणे आतापर्यंत 1 हजार 228 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पण तरीही अनेक तालुक्यांचा या यादीमध्ये समावेश नाही, असं देखील विरोधकांचं म्हणणं आहे. 


दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील निर्माण झालेल्या दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथक राज्यातील दुष्काळ व खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा दोन दिवसीय दौरा करणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतील काही तालुके व गावांमध्ये जाऊन हे पथक पाहणी करणार आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सावंगी, तुळजापूर, चौका, मोरहिरा, खामखेडा, डोणवाडी, तर सोयगाव तालुक्यातील जंगल तांडा, फर्दापूर, धनवट या 11 गावांचा यात समावेश आहे. 


ही बातमी वाचा: