पंढरपूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांची मनसे आघाडीतच काय, चर्चेत देखील नाही असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केलं आहे.


राज ठाकरे विद्यमान सरकारच्या विरोधात जरी असले तरी त्यांनी आघाडीत येण्याबाबत भूमिकाच अद्याप स्पष्ट केली नसल्याने ते चर्चेत कुठेच नाहीत, असं तटकरे म्हणाले. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या राष्ट्रवादीबाबतच्या भूमिकेबद्दल विचारले असता, त्यांचे नेमके दुःख, वेदना काय आहेत, हे मला माहित नाही. तरी ते आघाडीत येण्यास अनुकूल असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

राज्यात सर्व विरोधक भाजपच्या विरोधात एकत्र येऊन महाआघाडी स्थापन करतील, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. त्यासोबतच शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेमुळे त्यांच्याबाबत जनतेलाही अपेक्षा उरल्या नाहीत. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर शिवसेनेचे केंद्रातील मंत्रीच गैरहजर राहून स्वतःवरच विश्वास दाखवत नसतील तर जनता त्यांच्यावर कसा विश्वास ठेवणार? असा घणाघात तटकरे यांनी शिवसेनेवर केला. भाजपमधून मोठे आऊट गोईंग सुरु होणार असून, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या संपर्कात ही मंडळी असल्याची गुगली देखील त्यांनी टाकली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठीमुळे चर्चेला उधान आले होते. मात्र याबाबत सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण देत, चर्चेला पुर्णविराम लावला आहे.