परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 'युवकांची सामाजिक जबाबदारी आणि भविष्यातील आव्हानं' या विषयावर उज्वल निकम यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रवासादरम्यान त्यांना मराठवाड्यातील रस्त्यांची परिस्थिती कळली.
'एवढे खराब रस्ते असतील याची कल्पना ही केली नव्हती', अशी खंत उज्ज्वल निकम यांनी बोलून दाखवली. याबाबत आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी खड्डेमय रस्त्याच्या प्रवासातून वाचण्यासाठी त्यांनी रेल्वेने मुंबईला जाणं पसंत केलं.
या कार्यक्रमादरम्यान उज्वल निकम यांच्यातील मृदु कवि परभणीकरांनी अनुभवला. व्याख्यानाला उशिर झाला हा सूर पकडत अॅड निकम यांनी उपस्थित विद्यार्थांची मानसिकता हेरत कविता सादर केल्या. महाविद्यालयीन काळ, प्रेयसी आणि बायको यांच्यावरील कवितांमुळे सभागृहातील वातावरण आल्हाददायक बनले. त्यांच्या कवितांमुळे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांच्यासह उपस्थित पाहूणे, प्रेक्षक व विद्यार्थींमध्ये हस्यकल्लोळ पसरला.
शेवटी उज्वल निकम यांच्या दौऱ्यामुळे मराठवाड्यतील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न पून्हा ऐरणीवर आला आहे.