सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक जण माझ्या संपर्कात आहेत. त्यातील काही जण युतीत प्रवेशासाठी इच्छुक आहेत, मात्र पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील, असा गौप्यस्फोट गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ते सोलापुरात बोलत होते.


काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर अनेक जण नाराज आहेत. त्यामुळे मी स्वतः भाजपमध्ये आलो. आणखी जर कोणी युतीत प्रवेश केला तर त्यात आश्चर्य नाही, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. आषाढी एकादशीनिमित्त विखे पाटील सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात आले असता पत्रकारांशी ते बोलत होते.

सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजप-शिवसेनेच्या संपर्कात असून पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे, त्याविषयी प्रश्न विचारला असता विखे पाटील यांनी हा गौप्यस्फोट केला.

दरम्यान, आदित्य ठाकरे हे शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, अशी चर्चा सुरु असताना आदित्य ठाकरे यांच्याबाबत युतीतील दोन्ही पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. मी यावर भाष्य करणं चुकीचं ठरेल, असं म्हणत त्यांनी प्रश्न टोलवला.

मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला, ही ऐतिहासीक घटना असून मराठा समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय असल्याचं मत विखे पाटील यांनी व्यक्त केलं. हा मराठा समाजाचा विजय असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.