मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. पंतप्रधान मोदी यांनी आज देशातील निवडक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक अंमलबजावणी आदींची माहिती पंतप्रधानांना दिली. त्यावेळी त्यांनीही समाधान व्यक्त केले.


पंतप्रधान मोदी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधला.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी तसेच मुंबईहून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच अधिकारी यावेळी उपस्थित होते. विविध राज्यातील निवडक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यावेळी सहभागी झाले होते.  


यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी, जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, जिल्हा प्रशासनासह पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तसेच इतर सर्व यंत्रणांच्या सहकार्य आणि समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, जिल्ह्यातील कोरोनाच्या पहिल्या लाटेत केलेले प्रयत्न आणि दुसरी लाट थोपविण्यासाठी केलेल्या उपाययोजना आदींची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली. पंतप्रधान  मोदी यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे म्हणणे ऐकले.


PM Modi Meeting : मोदींच्या थेट जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवादावरुन नवं वादंग, बैठकीत मुख्यमंत्र्यांना केवळ बाहुलं बनवून ठेवल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप


केंद्र आणि राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशांची आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, ब्रेक दी चेन आदेशानुसार दैनंदिन जीवन विस्कळीत न होता बाधितांना शोधण्याची मोहिम याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली.  कोरोना चाचणी, लसीकरण, खासगी डॉक्टर/हॉस्पिटल यांच्याकडून आकारले जाणारे शुल्क रुग्णांना परत करण्यासाठी अशा विविध बाबींसाठी नोडल अधिकारी नेमल्याने कामात गती आली. त्याचा सकारात्मक परिणाम यंत्रणेवर झाला. ग्रामपातळीवरील यंत्रणा कार्यरत झाल्याचे ते म्हणाले.  


ऑक्सीजन उपलब्धता: जिल्ह्यातील ऑक्सीजन निर्मिती करणारे प्लान्ट, बाहेरुन आणण्यात येणारा ऑक्सीजन सुरक्षितरित्या पोहोचावा यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत केली. प्रत्येक ऑक्सीजन प्लान्टवर स्वतंत्र उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी समन्वय अधिकारी म्हणून नेमला. खासगी हॉस्पीटलकडून ऑक्सिजनची मागणी नोंदवून तेथील रुग्णसंख्येप्रमाणे त्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येऊ लागल्याने उपलब्ध ऑक्सिजन आणि मागणी हे बर्‍यापैकी स्थिर करण्यात प्रशासनाला यश आले. राज्य शासनाच्या ऑक्सिजन निर्मिती प्लान्टसाठी प्रोत्साहन देण्याच्या धोरणाची वेगाने अंमलबजावणी करुन जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्लान्टची उभारणी सुरु करण्यात आली असल्याचे त्यांनी पंतप्रधान श्री. मोदी यांना सांगितले.


कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण पातळी वरील यंत्रणा अतिशय महत्वपूर्ण आहे. हे ओळखून ग्रामपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील या ग्रामस्तरीय अधिकार्‍यांशी थेट संवाद सुरु केला. याशिवाय तेथील सरपंचांनाही यात सामावून घेतले. आपला गाव आपली जबाबदारी ही संकल्पना मांडली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्याप्रमाणे ग्रामीण भागात बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश करण्यापूर्वी विलगीकरण कक्षात भरती केले जायचे. ती पद्धत पुन्हा संपूर्ण जिल्ह्यात राबवली. तसेच दुसर्‍या लाटेत संसर्गाची गती पाहता बाधितांचे होम आयसोलेशन (गृह विलगीकरण) जिल्ह्यात बंद करण्यात आले. प्रत्येक बाधित व्यक्तीला थेट कोविड केअर सेंटर मध्ये भरती करण्याचे धोरण राबविले. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होत असल्याचे यावेळी डॉ. भोसले यांनी नमूद केले.


राज्य शासनाने सुरु केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आल्याने कोरोना बाधित रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे शक्य झाले. प्रतिबंधात्मक आदेश डावलून विनाकारण सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांची अॅण्टीजेन चाचणी सुरु करण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि संसर्गाचे प्रमाण पाहता महानगरपालिका प्रशासन, पोलीस यांच्या मदतीने विविध भागात मोहिम राबवून प्रतिबंधात्मक आदेशाचे भंग करणार्‍यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. वरिष्ठ अधिकार्‍यांसह महिन्यातून किमान दोन वेळा प्रत्येक तालुक्यांचा दौरा केला. यामुळे तालुकास्तरीय यंत्रणेलाही हुरुप आला. त्यांच्याशी केलेल्या संवादातून अधिकार्‍यांचे मनोबल उंचावले. त्याचा अपेक्षित परिणाम दिसू लागल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी यावेळी दिली.


जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणाना उद्युक्त केले. ज्या गावांनी कोरोना संसर्ग रोखण्यात यश मिळविले, त्या गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांचे मनोबल बाढविले. आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष आणि हिवरेबाजार गावचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी त्यांचे गाव कोरोनामुक्त केले. त्यांना व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये बोलावून त्यांचे अनुभव इतर गावातील सरपंच आणि ग्रामस्तरीय अधिकारी यांना ऐकवले, त्याचाही सकारात्मक परिणाम गावागावात झाल्याची माहिती डॉ. भोसले यांनी यावेळी  दिली.   


मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे कौतुक


अहमदनगर जिल्ह्याने केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्याकडून त्यासंबंधितीची माहिती घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पालकसचिव आशीषकुमार सिंह यांच्यासह विविध मान्यवरांनी दूरध्वनी करुन डॉ. भोसले यांचे कौतुक केले.  


जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत मोदींनी कोणत्या सूचना केल्या?


लसीचा एक डोसही वाया घालवू नका, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. एक डोस वाया जाणं म्हणजे एखाद्याला आजारापासून संरक्षण नाकारल्यासारखं आहे, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी आज दहा राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थितीबाबत चर्चा केली. यात महाराष्ट्रातील 17 जिल्हाधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. यावेळी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी आपल्या जिल्ह्यात कोविड संसर्ग रोखण्यासाठी कोणती वैशिष्ट्यपूर्ण पाऊले उचलली याची माहिती दिली. कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या.कोरोनाव्हायरस अदृश्य आहे, रुपं बदलत असतो; त्यामुळे आपला दृष्टीकोन सातत्याने गतिशील आणि सुधारित असायला हवा.  कोरोनाव्हायरसच्या म्युटेशनमुळे तरुण, लहान मुलांबद्दल अधिक चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे आपण त्यासाठी तयार असणं आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कोविड संसर्गाची माहिती आणि त्यांच्या संबंधित जिल्ह्यातील तरुण तसंच मुलांमधील गांभीर्य याविषयी माहिती गोळा करण्यास सांगितलं आहे. लसीच्या अपव्ययाबाबत मोदींनी इशाराच दिला आहे. लसीचा एक डोसही वाया जाऊ नये असं मोदींनी म्हटलं. एक डोस वाया जाणं एखाद्याला आजारापासून संरक्षण नाकारल्यासारखं  आहे.