वर्धा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपतींनी अंबर चरखा चालवत सूत कताई केली. दरम्यान राष्ट्रपतीनी नियोजित वेळेपेक्षा तब्बल 15 मिनिटं जास्त वेळ आश्रमात घालवला. राष्ट्रपतींनी सेवाग्राममध्ये महात्मा गांधीजींच्या आश्रम परिसरातील आदी निवास, बा कुटी, बापू कुटी, खादी निर्मिती केंद्र आदी ठिकाणी भेट दिली. यावेळी राष्ट्रपती कोविंद यांच्यासह पत्नी सविता, मुलगी स्वाती, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभू आदींची उपस्थिती होती. आश्रम प्रतिष्ठानच्या वतीनं राष्ट्रपतींचं स्वागत करण्यात आलं.


यावेळी त्यांनी अंबर चरख्यावर सूत कताईचा अनुभव घेतला. त्यांनी पाऊण तास म्हणजेच त्यांच्या निश्चित कालावधीपेक्षा 15 मिनिटे अधिक वेळ आश्रमात दिला. आज सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या  सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी  राष्ट्रपती रामनाथ कोविंद वर्धा येथे आले होते.

सेवाग्रामच्या बापू कुटीमध्ये येणं हे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. आपण या वर्षी महात्मा गांधीजींची 150 वी जयंती साजरी करत आहोत. या प्रसंगी सेवाग्रामला भेट देणं हे खूप आनंददायी आहे, असे कोविंद यांनी लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे.

यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी 9 मीटर खादी खरेदी केली. याकरिता त्यांनी दोन हजार सतरा रुपये दिले. राष्ट्रपतींनी  बापू कुटी येथे  प्रार्थना करून महादेवभाई देसाई  कुटीमध्ये सुरू असलेल्या कापूस ते कापड प्रकल्पाची तेथील महिला विणकारांकडून माहिती घेतली. तसेच आश्रमात चंदन वृक्षाची लागवड करून त्यांनी तब्बल  पाऊण तास आश्रमात घालवला.

यावेळी आश्रमाच्या वतीनं राष्ट्रपतींना चरख्यातून होणाऱ्या उद्योग निर्मितीची माहिती दिली. राष्ट्रपतींनी पुन्हा आश्रमात येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी अभिप्राय पुस्तिकेत अभिप्रायही नोंदविला.

राष्ट्रपती कोविंद यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाच्या वतीने प्रकाशित 'महात्मा गांधी लाईफ थ्रू लेन्सेस' हे इंग्रजी आणि 'महात्मा गांधी चित्रमय जीवन गाथा' हे महात्मा गांधीजींच्या  दुर्मिळ छायाचित्रांवर आधारित हिंदीतील कॉफीटेबल बुक सेवाग्राम आश्रमाला भेट दिले.

सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा कार्यक्रमाला उपस्थिती

महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या सभागृहात सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा कार्यक्रमाला ते उपस्थित होते.  यावेळी भाषणाच्या सुरुवातीला राष्ट्रपती यांनी महाराष्ट्रासह देशभरातील पूरग्रस्तांसाठी भावना व्यक्त केल्या. केंद्र सरकार योग्य ती मदत करेल असे ते यावेळी म्हणाले. महात्मा गांधी यांच्या जीवनात सेवाग्राम आश्रमाचे महत्वाचे आहे. इथूनच त्यांनी सत्य, सेवा आणि अहिंसा हे प्रयोग राबवायला सुरुवात केली. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे महत्व अनन्यसाधारण आहे. कारण देशातील ग्रामीण भागात सुरू झालेले हे पहिले मोठे मेडिकल इन्स्टिट्यूट होते. येथे शिकणारे विद्यार्थी फक्त वैदकीय शिक्षण घेत नाही तर त्यांना गांधी यांचे विचार, तत्व देखील शिकतात, असे ते म्हणाले.