परभणी : दोन वर्षांपूर्वीच प्रेम विवाह केलेल्या तरुणाने आपसातील वादातून पत्नीचा गळा आवळून खून करत पोबारा केला आहे. विशेष म्हणजे प्रेम विवाह केल्यामुळे दीड वर्षांपूर्वीच या तरुणीच्या आई-वडिलांनी मुलाच्या आईचा दगडाने ठेचून खून केला होता. मुलीच्या आई-वडीलांना न्यायालयाने कोठडी सुनावली होती. या मर्डर मिस्ट्रीने परभणीत खळबळ उडाली आहे.


परभणी शहरातील पंचशील नगर येथील अनंत खंदारे व शेजारीच राहणाऱ्या मयुरी वाकळे या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. यातूनच त्यांनी दोन वर्षांपूर्वीच प्रेम विवाह केला होता. लग्नाच्या ६ महिन्यातच मयुरीची आई आणि वडील चंद्रकांत वाकळे यांनी अनंत खंदारे या त्यांच्या जावयाची आई (वाकळेंची विहीन) गयाबाई खंदारे यांचा "तुझ्या मुलाने माझ्या मुलीसोबत लग्न का केले?" असा सवाल करत दगडाने ठेचून खून केला होता. याप्रकरणी मयुरीची आई व वडील चंद्रकांत वाकळे हे न्यायालयीन कोठडीत आहेत.

काही दिवसांपूर्वी मयुरीच्या आईचा जामीन झाला परंतु अद्याप वडील कारागृहातच आहेत. मंगळवारी रात्री मयुरी आणि अनंत यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात अनंतने मयुरीचा गळा दाबून खून केला आणि तो पसार झाला. या घटनेने परभणीत खळबळ उडाली आहे. नेमका अनंतने आईच्या खुनाचा बदला घेतला की या खुनामागे अजून कोणते कारण आहे? याचा पोलीस सध्या तपास करत आहेत.