मुंबई : मुंबई, पुणे आणि नाशिकमधील नागरिकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी लवकरच म्हाडाच्या घराची लॉटरी निघणार आहे. मुंबई, पुणे, नाशिकमधील हजारों घरांसाठी आचारसंहिता लागण्याआधी लाॅटरी निघणार असल्याची घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली आहे. तर औरंगाबादमध्ये आचारसंहितेनंतर या घरांसाठी लॉटरी निघणार आहे.


म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. मुंबईत 238 घरांसह 107 गाळ्यांसाठी लॉटरी निघणार आहे. तर पुण्यात 4464 घरांसाठी म्हाडाची लॉटरी असेल.

नाशिकमध्ये 1000 घरांसाठी आचारसंहितेच्या आधी लॉटरी निघणार आहे तर औरंगाबादमध्ये 800 घरांसाठी आचारसंहितेनंतर लॉटरी निघणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.

कोकणविभागात देखील 9000 घरांची लॉटरी निघणार आहे. ही घरे कल्याण - डोबिंवली, खोणी, अंतरर्ली या परिसरात असतील, असे सामंत यांनी सांगितले.

तर मुंबईतल्या तुंगा पवईतील घरांच्या किंमती कमी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. म्हाडाचा कर थकवलेल्या खाजगी बांधकाम व्यावसायिकांविरोधात केस दाखल करणार असल्याचे सामंत  म्हणाले. 130 कोटींचा कर व्यावसायिकांनी थकविला आहे, असे त्यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य कर्मचाऱ्यांना  वेतन आयोग लागू होणार आहे. यासोबतच  म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी देखील खुशखबर असून म्हाडाच्या कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.