कोल्हापूर : कोल्हापूरची पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार हातकणंगले तालुक्यातील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीचा विषय पाहून हातकणंगले पोलीस ठाण्यातील कर्मचारी अवाक् झाले.


शंभरहून अधिक ग्रामस्थ पोहण्याचे साहित्य, मासेमारीची जाळी, डालगी घेऊन थेट पोलीस ठाण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला.

पंचगंगा नदी ज्या ठिकाणी होती, त्या ठिकाणी हिरवं गवत उगवलं आहे. पाण्याने भरलेली आपली पंचगंगा चोरीला गेली, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

तक्रारीचा विषय पाहून सुरुवातीला पोलीसही अवाक् झाले. त्यानंतर ही तक्रार दाखल होत नसल्याचं सांगताच ग्रामस्थ आणि पोलिसांच्यात बाचाबाची झाली. दोन तासाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी ग्रामस्थांचा तक्रार अर्ज स्वीकारला.

पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार जरी हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली असली तरी या ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण, कोल्हापूरची पंचगंगा प्रदूषित झाली आहे.

पाण्याच्या जागेवर कित्येक किलोमीटरवर जलपर्णीचा विळखा झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र सुस्त बसून आहे. झोपलेल्या प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी हातकणंगले ग्रामस्थांना पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार द्यावी लागली.