Palghar, Nashik Buldhana Unseasonal Rain : हवामान विभागाने राज्यात तीन दिवस अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता वर्तवली असताना, पालघर (Palghar), नाशिक (Nashik) तसंच बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पालघर जिल्ह्याच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळला. तर नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पाऊस बरसला. यामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस


पालघर जिल्ह्याच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाडा, विक्रमगड, जव्हार आणि पालघरच्या काही भागात विजांचा कडकडाटासह पाऊस बरसला. यामुळे सर्वसामान्य शेतकरी, बागायतदारस वीट भट्टी व्यावसायिक यांच्यात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरलं आहे. आंबा त्याचप्रमाणे इतर रब्बी पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.


नाशिकमध्ये जोरदार पाऊस, पिकांना फटका बसण्याची शक्यता


दुसरीकडे नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. या पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष यांसह भाजीपाला पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने आधीच हवालदिल झालेल्या बळीराजासमोर अवकाळी पावसाच्या रुपाने नवं संकट उभं राहिलं आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचं देखील समोर आलं आहे.


बुलढाण्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे चिंतातूर 


बुलढाणा जिल्ह्यात रात्री जवळपास सर्वच तालुक्यात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस बरसला. या अवकाळी पावसाचा फटका गहू, हरभरा आणि कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा चिंतातूर झालेला आहे.


छत्रपती संभाजीनगरमध्येही पावसाच्या सरी


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये रात्री पावसाच्या सरी बरसल्या. शहरातील काही भागात देखील रात्री तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळाली.


हवामान विभागाचा अंदाज


दरम्यान महाराष्ट्रात तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 5 ते 8 मार्च दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 7  मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होईल. 


फळबागा, पिकांना फटका


राज्यात सातत्याने तापमानात चढ उतार होत आहेत. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. या हवामानाचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर (Rabi Crop) होत आहे. त्यातच  अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू आणि हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. शिवाय पिकांवर रोग पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तसंच फळबागांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे. 


दरम्यान शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची काढणी सुरु केली आहे. यामध्ये तूर, हरभरा, वाल पिकाची काढणी सुरु आहे. अशातच अचानक अवकाळी पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांची तारंबळ उडाली. 


हेही पाहा


Rain : नाशिकसह धुळे बुलढाणा आणि पालघर जिल्ह्यात अवकाळी पाऊस