मनमाड : कांद्याला अत्यल्प भाव मिळाल्यानं येवला तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं 70 क्विंटल कांद्यावर ट्रॅक्टर फिरवला आहे. मारुती गुंड असं शेतकऱ्याचं नाव आहे. दुसरीकडे चांदवड तालुक्यातील शेतकरी आनंद मंडलिक यांनीही 25 क्विंटल कांदा उकिरड्यावर फेकून दिला आहे.


चांगला भाव मिळेल या आशेवर कांदा साठवलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अक्षरश पाणी आलं आहे. कांद्याला 5 ते 10 पैसे प्रतिकिलो भाव मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या संतप्त भावना उफाळून येत आहेत.

चांगला भाव मिळेल या आशेवर साठवून ठेवलेल्या कांद्याला आता व्यापारी विकत घेत नाही. घेतला तर त्याला 5 ते 10 पैसे किलोचा दर मिळत असल्याने शेतकऱ्याला वाहतूक करणे अवघड झाले आहे.

याच नैराश्यामधून चांदवड तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकरी आनंद मंडलिक हे 25 क्विंटल कांदा घेऊन सकाळी लासलगांव येथे कांदा विक्रीला घेऊन गेले असता त्यांना 7 पैसे किलो दर मिळाला. यामुळे त्यांनी कांदा विक्री न करता तो पुन्हा घरी आणला तो उकिरड्यावर फेकून दिला. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे येवला तालुक्यातील पिंपरी येथील मारुती गुंड या शेतकऱ्याने 70 क्विंटल शिल्लक कांदा शेतात टाकून त्यावर ट्रॅक्टर फिरवला. शेतात खत म्हणून आता त्याचा वापर होत आहे.

महिला शेतकऱ्याने कांदा विकून मिळालेले चार रुपये कृषिमंत्र्यांना पाठवले
शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथील महिला शेतकरी मनिषा संजय बारहाते यांना 32 गोण्या कांदे विकल्यानंतर अवघे चार मिळाले. संतापलेल्या मनिषा यांनी ते चार रुपये केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना मनीऑर्डर केले होते.

कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. मनिषा बारहाते यांनी कांद्याच्या 32 गोण्या पारनेर येथील एका व्यापाऱ्याला विकल्या होत्या. साधारण एक ते दोन रुपये किलो त्यांच्या कांद्याला भाव मिळाला. त्यातून त्यांना 2362 रुपये एवढी रक्कम मिळाले, मात्र इतर सर्व खर्च वजा करता त्यांना 32 गोण्यांचे केवळ चार रूपये हातात मिळाले होते.

मात्र एवढ्या कष्टाने पिकवलेल्या पिकाला अवघे चार रुपये मिळाल्याने संतापलेल्या मनिषा यांनी मिळालेली रक्कम केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग मनीऑर्डर केली. तसेच कृषिमंत्र्यांच्या पत्नीला बांगड्यांचा बॉक्स पाठवून आपला सरकारच्या कृषी धोरणाचा निषेध केला. मनिषा यांच्या या कृतीचे अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे. तर त्याआधी नाशिकच्या संजय साठे या शेतकऱ्याने त्यांच्या सात क्विंटल 50 किलो कांद्याला लासलगाव बाजारसमितीत केवळ 1 हजार 64 रुपये मिळाले. ही रक्कम ऑनलाईन मनीऑर्डरद्वारे पंतप्रधान कार्यालयातील आपत्कालीन निधीसाठी देत सरकारचा निषेध केला होता.