नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येनंतर पंढरपूरमध्ये मोठी सभा घेतली. दोन्ही सभांमध्ये त्यांनी राम मंदिरावरुन भाजपला लक्ष्य केले. त्यानंतर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या नागपूर 'तरुण भारत'मधून संघाने उद्धव यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुखपत्राच्या आग्रलेखात "उद्धव ठाकरेंना बोलण्याचे भान नाही, आगामी निवडणुकांमध्ये जनताच त्यांना फळ देईल," असे म्हटले आहे.


आग्रलेखात म्हटले आहे की, "उद्धव टाकरेंना काय बोलावे, काय बोलू नये, आपण काय करत आहोत, काय करायला पाहिजे याचे भान राहिलेले दिसत नाही. उद्धव ठाकरे सरकारला चोर म्हणतात याचा अर्थ ते स्वत:च्या मंत्र्यांनाही आणि पक्षालाही चोर म्हणत आहेत. त्यांना असे वाटत आहे की, आपण काय करतोय हे जनतेला कळत नाही. परंतु आगामी निवडणुकांमध्ये जनता त्यांना धुळीत मिळवल्याशिवाय राहणार नाही."

काय लिहिलंय आग्रलेखात?
"पहारेकरी चोर आहे, असे बोलून उद्धव ठाकरेंनी राहुल गांधीची री ओढत पंतप्रधानपदाचा अवमान केला आहेच, पण आपण राजकारणात किती अपरिपक्व आहोत याचे त्यांनी दर्शन घडवले. सरकारमध्ये राहण्याचा मोह शिवसेना आवरु शकली नाही, सत्ता सोडण्याची शिवसेनेत हिम्मतही नाही."

उद्धव ठाकरे आंधळे, ढोंगी
आग्रलेखामध्ये शिवसेनेच्या नेत्यांचाही संघाने समाचार घेतला आहे. "पर्यावरण मंत्री रामदास कदम माजी मुख्यमंत्री नारायण राणेंवर शेलक्या शब्दात टीका करतात, यावरुन शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची लायकी समजते. 18-18 तास काम करणाऱ्या पंतप्रधानांना जर ठाकरे कुंभकर्ण म्हणत असतील तर ते आंधळे आहेत. सर्व काही दिसत असूनही दिसत नसल्यासारखे बोलत असतील तर त्यांना ढोंगी म्हणावे लागेल."