मुंबई: जगाच्या आणि देशाच्या इतिहासाच्या दृष्टीने 15 नोव्हेंबर हा दिवस अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. आजच्या दिवशी इतिहासात लीग ऑफ नेशन्सची पहिली बैठक पार पडली. तसेच सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आजच्याच दिवशी आदिवासी राज्य असलेल्या झारखंडची स्थापना करण्यात आली. यासह आज इतिहासात इतर कोणत्या घडामोडी घडल्या त्या जाणून घेऊया.


1920- लिग ऑफ नेशन्सची पहिली बैठक 


पहिल्या महायुद्धाच्या खाईत युरोप चांगलाच होरपळून निघाला होता. पहिले महायुद्धामध्ये (1914-1918) जवळपास एक कोटी सैनिक आणि लाखो नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे असं आणखी एक महाभयंकर युद्ध होऊ नये अशी सर्वांची इच्छा होती. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या पुढाकाराने 1920 रोजी लीग ऑफ नेशन्सची स्थापना करण्यात आली. या लीग ऑफ नेशन्सची पहिली बैठक 15 नोव्हेंबर 1920 रोजी पार पडली. 


लीग ऑफ़ नेशन्स 1920 ते 1946 दरम्यान अस्तित्वात असणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था होती. स्वित्झरलँडमधील जिनिव्हा येथे या संघटनेचं मुख्यालय होतं. पण याच संस्थेच्या काळात दुसरं महायुद्ध झालं. दुसरं महायुद्ध टाळण्यामध्ये या संस्थेला अपयश आल्याने ही संस्था 1946 साली बंद करण्यात आली. त्या ठिकाणी नंतर संयुक्त राष्ट्रांची स्थापना करण्यात आली. 


1949- महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा 


महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसे (Nathuram Godse) आणि नारायण दत्तात्रय आपटे या दोघांना 15 नोव्हेंबर 1949 रोजी अंबाला मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली. नथूराम गोडसे याने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या केली होती. भारताच्या फाळणीच्या वेळी गांधीजींनी ब्रिटिश भारतातील मुस्लिमांच्या राजकीय मागण्यांना अनुकूलता दर्शवली असं नथूरामचं मत होतं. त्याने नारायण आपटे आणि इतर सहा जणांसोबत गांधीजींच्या हत्येचा कट रचला. 


एक वर्षभर चाललेल्या खटल्यानंतर, गोडसेला 8 नोव्हेंबर 1949 रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. गांधींचे पुत्र मणिलाल गांधी आणि रामदास गांधी यांनी त्याला सोडून देण्यात यावं अशी मागणी केली होती. परंतु त्यावेळचे भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल आणि गव्हर्नर-जनरल सी. राजगोपालाचारी यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. 


1982- भूदानचे प्रणेते विनोबा भावे यांचं निधन 


थोर गांधीवादी आचार्य आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावे (Vinoba Bhave) यांचं आजच्या दिवशी म्हणजे 15 नोव्हेंबर 1982 रोजी निधन झालं. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसिलातील गागोदे हे विनोबा भावे यांचे मूळ गाव. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सर्वोदय समाजाची स्थापना केली. महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा असलेल्या विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. या चळवळीचा प्रारंभ आंध्र प्रदेशातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातून झाला. यात त्यांनी श्रीमंत शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा काही हिस्सा भूमीहीन, गरीब लोकांना दान करण्याचे आवाहन केले. हळूहळू भूदान चळवळीची व्यापकता वाढत गेली. आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक, ओरिसा आणि महाराष्ट्रात या चळवळीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.


1986- सानिया मिर्झाचा जन्मदिन 


भारतीय स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हिचा आजच्या दिवशी म्हणजे, 15 नोव्हेंबर 1986 रोजी हैदराबादमध्ये जन्म झाला. सानियाने आजवर तीन ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या मिश्र दुहेरीची तर एका ग्रँड स्लॅम स्पर्धेत महिला दुहेरी अशी एकूण चार अजिंक्यपदे मिळवली आहेत. तसेच तिने एकेरीच्या चौथ्या फेरीमध्ये धडक मारली आहे. ती भारतामधील सर्वोत्तम महिला टेनिसपटू समजली जाते.


सानियाला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार तर 2006 साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे. सानिया मिर्झा भारताच्या तेलंगणा या राज्याची ब्रॅन्ड ॲम्बॅसॅडर आहे. 2010 साली तिने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला. सानिया मिर्झाने 'Ace against Odds' ही आत्मकथा लिहिली आहे.


सध्या सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा आहे. पण या दोघांचा एक एकत्रित शो येत असून त्या शोच्या प्रमोशनसाठी हा फंडा असल्याचंही बोललं जातंय. 


1989- सचिन तेंडूलकर आणि वकार युनूस यांचे क्रिकेटमध्ये पदार्पण 


सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने आजच्याच दिवशी म्हणजे 15 नोव्हेंबर 1989 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने आपला पहिला सामना पाकिस्तानमधील कराची येथे खेळला. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या वकार युनिसचा हा पहिलाच सामना होता.  त्या सामन्यात त्याने वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादीर यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सपहिल्या सामन्यात वकार युनूसने त्याला 15 धावांवर त्रिफळाचित केले.


सन 2003 सालच्या विश्वचषकात सचिन तेंडूलकर हा मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. 2011 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. 20 नोव्हेंबर 2009 रोजी त्याने कारकिर्दीतील 30 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला.


2000- झारखंड राज्याची स्थापना 


आजच्या दिवशी म्हणजे 15 नोव्हेबर 2000 रोजी झारखंड या भारतातील 28 व्या राज्याची स्थापना करण्यात आली. बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा काढून, या राज्याचा निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन 2000 मध्ये संमत केला आणि झारखंड अस्तित्वात आले. या राज्यात आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्या आधारे वेगळ्या राज्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. 


2012- शी जिनपिंग कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव बनले 


शी जिनपिंग हे चीन देशाचे सर्वोच्च नेते आहेत. 2012 साली त्यांची चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिव पदी निवड करण्यात आली होती. 


1961- संजय राऊत यांचा जन्मदिन


शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आज 63 वा वाढदिवस आहे. संजय राऊत यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1961 रोजी झाला. संजय राऊत सध्या  शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आहेत. सन 2004 पासून ते सातत्याने राज्यसभेवर निवडून जात आहेत. तसेच राज्यसभेतील ते शिवसेनेचे नेतेही आहेत. त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे.


बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हयात असतानाच संजय राऊत यांच्यावर त्यांना सामनाच्या कार्यकारी संपादकपदाची जबाबदारी सोपवली. राज्यात महाविकास आघाडी सरकार बनवण्यात आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने त्यांच्यावर काही आरोप ठेवले आहेत.