Nagpur News नागपूर  महाराष्ट्रात कुशल प्रशासकांच्या यादीमध्ये अनेक कुशल राज्यकर्त्या स्त्रियांचीही नावे अग्रस्थानी पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील पितृसत्ताक संस्कृतीला तडा देणारे असेच एक नाव म्हणजे “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” (Punyashlok Ahilyadevi Holkar) हे आहे. अशा कर्तुत्ववान स्त्रीयांमुळे महाराष्ट्राला धाडसी स्त्रियांचा वारसा लाभला आहे. राजमाता अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या जयंतीचे हे यंदाचे 300 वे वर्ष आहे.


या 300 व्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय कार्यकारिणी आणि राष्ट्र सेविका समितीच्या वतीने देशभरात 300 भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. नुकतीच अखिल भारतीय कार्यकारिणी आणि राष्ट्र सेविका समितीच्या प्रतिनिधींची बैठक 12 ते 14 जुलै दरम्यान नागपूरच्या रेशीमबागेतील स्मृती मंदिर येथे पार पडली. या बैठकीत 35 प्रांतातील सुमारे 400 प्रतिनिधी सहभागी झाले होते.


अहिल्याबाई होळकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त 300 भरगच्च कार्यक्रम


या प्रातिनिधीक बैठकीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जन्मशताब्दीनिमित्त 300 कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये राजमाता अहिल्याबाई  होळकर यांच्या जीवनावर आधारित स्पर्धा, रील, नाट्यप्रवेश, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, युवा वसतिगृहांना भेटी देऊन अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची जाणीव करून देणे, असे अनेक भरगच्च कार्यक्रमांतून लोकमाता अहिल्याबाई यांचे जीवन लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सोबतच या प्रतिनिधी सभेत नेशन पॅरामाउंट या विषयावरील ठराव मंजूर करण्यात आला. या माध्यमातून सर्व भारतीयांनी त्यांचे उत्तम तत्वज्ञान आणि जीवनमूल्ये अंगीकारून ती आचरणात आणावीत, असे आवाहन प्रातिनिधिक सभेने समाजाला केले आहे.


प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रहित सर्वोपरि मानून नागरी कर्तव्ये पार पाडणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या (Rashtra Sevika Samiti) प्रमुख संचालक शांताक्का यांनी व्यक्त केलय. या सभेला संबोधित करतांना त्यांनी हे भाष्य केलंय. त्या पुढे म्हणाल्या की, "सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्याचा दृढनिश्चय करणारा समाज घडवायचा आहे आणि त्यासाठी काम वाढवायचे असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.


भविष्यात कधीही आणीबाणीची पुनरावृत्ती होऊ नये


भारतीय लोकशाही इतिहासातील काळा अध्याय म्हणजेच आणीबाणीची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये हे नितांत आवश्यक आहे. आणि म्हणूनच भारत सरकारने 25 जून रोजी "संविधान हत्या दिन" साजरा करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर करण्यात आला.अखिल भारतीय कार्यकारिणी आणि राष्ट्र सेविका समितीच्या प्रतिनिधींची ही बैठक 12 ते 14 जुलै 2024 दरम्यान रेशीम बाग, स्मृती मंदिर, नागपूर येथे झाली. या बैठकीत 35 प्रांतातील 400 प्रतिनिधी सहभागी झाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या