शिर्डी : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदा पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात पुढील मुख्यमंत्री आघाडीचा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी मझ्या विश्वास दाखवून मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. मोठं आव्हान आमच्यासमोर असणार आहे. काँग्रेस आणि मित्रपक्षांचा राज्यात मोठा जनसंपर्क आहे. त्याद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करु, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.



लोकसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांना नवा उत्साह आम्ही निर्माण करु. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मित्र पक्षांच्या साथीने राज्यात पुन्हा आघाडीचं सरकार आणू, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.


आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे नेतृत्व बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. तर डॉ. नितीन राऊत, डॉ. बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन या पाच जणांची कार्यध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

इतर नियुक्त्या

बाळासाहेब थोरात - रणनीती समिती, अध्यक्ष
पृथ्वीराज चव्हाण - जाहीरनामा समिती, अध्यक्ष
सुशीलकुमार शिंदे - समन्वय समिती, अध्यक्ष
नाना पटोले - प्रचार समिती, अध्यक्ष
रत्नाकर महाजन - प्रसिद्धी आणि प्रकाशन समिती, अध्यक्ष