Sharad Pawar : धर्माच्या नावाने देशात अंधकार पसरवण्याचा प्रयत्न; धर्मांध शक्तींच्या विरोधात लढावे लागणार : शरद पवार

धर्माच्या नावानं देशात अंधकार पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.

Continues below advertisement

Sharad Pawar : आज देशाचं राजकारण वेगळ्या दिशेनं जातं आहे. धर्माच्या नावानं देशात अंधकार पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. देश घडवणाऱ्यांचा आदर करायचं सोडून त्यांच्यावर टीका टिपण्णी केली जात आहे. मात्र हे राज्य वेगळ्या विचार करणाऱ्यांच्या हातात आहे. आपल्याला धर्मांध शक्तीच्या विरोधात लढाई करावी लागणार असल्याचेही शरद पवार यावेळी म्हणाले.

Continues below advertisement

शरद पवार यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येत माजी मंत्री शिवाजीराव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर आरोप करत त्यांनी पुन्हा हातावर राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं आहे. यावेळी पवार बोलत होते. दरम्यान, कोण व्यवसाय चांगला करत असेल तर तो कोणत्याही जाती धर्माचा असला तरी  व्यवसाय करु शकतो. पण हा अमुक एका धर्माचा म्हणून त्याच्याकडून माल घ्यायचा नाही अशी भूमिका देश पुढे घेऊन कसा जाईल असेही पवार यावेळी म्हणाले. कर्नाटकमध्ये अल्पसंख्याकांच्या दुकानातून माल खरेदी करु नका असा काही संघटनांनी फतवा काढला. या मुद्यावरुन पवारांनी भाजपवर निशाणा साधला.
 
सध्या राज्यात उसाची शेती इतकी वाढली आहे की मला याची काळजी वाटते. जवळपास मे अखेरपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील असे दिसत असल्याचे पवार म्हणाले. पाणी दिसलं की आपण ऊस लावतो, पण आता नवीन विचार करावा लागेल. ब्राझील, अमेरिकासारख्या देशात इथेनॉलचा वापर जास्त करतात आपल्याला देखील तसा विचार करावा लागेल असेही पवार यावेळी म्हमाले.

आजच्या दिवशी आनंदाची गुढी उभा करुन आपण सगळे इथे आलात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभारलेली विकासाची गुढी भक्कम करण्यासाठी आपण आलात असे पवार म्हणाले. योग्य असेल तर पाठींबा द्यायला आणि योग्य नसेल तर वेगळी भूमिका घ्यायला हा भाग कधी मागे पडला नसल्याचे शरद पवार म्हणाले. स्वातंत्र्य लढ्यात या भागाचं खूप मोठं योगदान आहे. शिवाजीराव नाईक हे यशस्वी जि.प अध्यक्ष होते. राज्यात ते अग्रभागी असत असेही पवार म्हणाले. शेती, उद्योग अशा विविध विभागात त्यांनी काम केलं आहे. आज शिवाजीराव नाईक पुन्हा घरी परतत आहेत, त्याचा मला आनंद आहे. शिवाजीराव नाईक यांच्या कामाचा राज्यातील सर्व भागात उपयोग करुन घेतला पाहिजे असे शरद पवार यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola