Jitendra Awhad:  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक (Jitendra Ahwad Arrested ) केली आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर आपण जामीन घेणार नसल्याचे आव्हाड यांनी 'एबीपी माझा' सोबत बोलताना सांगितले. 


'हर, हर महादेव' चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण झाले आहे शिवाजी महाराजांची बदनामी झाली आहे. या बदनामीला विरोध करत असल्याने अटकेची कारवाई होत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे, सरकार मला शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगण्यापासून रोखत आहे, हे सरकार कोणाचे आहे हे स्पष्ट होत असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. आव्हाड यांच्यासह आणखी काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. 










राड्याप्रकरणी आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. वर्तकनगर पोलिसात गुन्हा कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल  करण्यात आला होता. फिर्यादी परीक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला पोलिसांनी लावलेली कलमे ही जामिनपात्र गुन्हे होते. त्यानंतर आणखी काही कलमांतंर्गत गुन्हे नोंदवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारची दडपशाही असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. 


..तर त्यांना आयुष्यभर जेलमध्ये ठेवलं पाहिजे : संदीप देशपांडे


मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाईचं स्वागत केलं आहे. "कायदा आपलं काम करत आहे. ज्यापद्धतीने तुम्ही एका क्षेत्रात जाता, प्रेक्षकांना मारहाण करता ते चुकीचं आहे. सूडबुद्धीने कारवाई करण्याचा प्रश्नच नाही. अशी थेरं करत असतील तर त्यांना आयुष्यभर जेलमध्ये ठेवलं पाहिजे. आधीही मंत्री असताना एकाला घरी बोलावून मारहाण केली होती. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली होती. अविनाश जाधव तिथे गेले होते. कारवाई होतेय ही चांगली गोष्ट आहे," अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.


सुप्रिया सुळे म्हणाल्या...


राज्यात चालले काय आहे असा सवाल करताना चूक करतो त्याला माफी दिली जाते आणि लढतो त्याला शिक्षा दिली जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. आव्हाड लढवय्ये नेते असल्याचे सांगत शिवाजी महाराजां विरोधात काही चुकीचं होत असेल तर आम्ही विरोध करणारच असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले. 


Jitendra Ahwad Arrested for Har Har Mahadev : जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक,मॉलमधील राडा भोवला