Nawab Malik Meet Ajit Pawar :  सध्या जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची देवगिरी या शासकीय बंगल्यावर भेट घेतली. अजित पवार आणि नवाब मलिक यांची सुमारे एक तासभर चर्चा झाली. यावेळी मलिक यांची कन्या सना मलिकदेखील (Sana Malik) उपस्थित होत्या. मलिक यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधााण आले. मलिक हे देवगिरी बंगल्यातून निघून गेल्यानंतर अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हे अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरीवर दाखल झाले. 


आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीदरम्यान मलिक हे देवगिरीवर दाखल झाल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले. 


आजच्या बैठकीत काय झालं?


राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि त्यांची कन्या सना मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक तास भेट घेतली. आजच्या बैठकीत मतदारसंघातील कामे होत नसल्याची माहिती मलिक यांनी दिली असल्याचे सूत्रांनी म्हटले. मतदारसंघातील नागरिकांची अनेक प्रलंबित कामे याबाबतची निवेदने अजित पवार यांना दोघांच्यावतीने देण्यात आली. राष्ट्रवादी पक्ष सत्तेत असून देखील कामे होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत  मलिक यांची कन्या सना मलिक या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम करत होत्या. यातून सना मलिक या नवाब मलिक यांच्या राजकीय वारस असल्याची चर्चा सुरू होती. 


विधानसभेसाठी तयारी?


नवाब मलिक हे मुंबईतील अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार तुकाराम काते यांचा 12 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. त्याआधी 2014 च्या निवडणुकीत तुकाराम काते यांनी मलिक यांचा 1007 मतांनी पराभव केला होता. आता राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षात फूट पडली आहे. तुकाराम काते हे सध्या ठाकरे गटासोबत आहेत. तर, मलिक हे तूर्तास अजित पवारांसोबत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. यासाठी मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी मलिक हे अधिक आग्रही आहेत. 


विधीमंडळ अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर


नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात मलिक यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते सत्ताधारी बाकांवर बसले. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवारांना साथ दिली असल्याची चर्चा सुरू झाली होती. तर, दुसरीकडे मलिक हे सत्ताधारी बाकांवर आल्याने विरोधी पक्षांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर टीकास्त्र सोडले होते. मलिक यांना अटक झाली तेव्हा भाजपने त्याचे कृत्य देशद्रोही असल्याचे म्हणत त्यांच्या अटकेच्या कारवाईचे समर्थन केले होते. तर, शिवसेनेत फूट पाडल्यानंतर शिंदे गटानेदेखील उद्धव ठाकरे यांनी मलिकांबाबत घेतलेल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते.