नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यंदा देशभरातील 18 बालकांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कारविजेत्या मुलांमध्ये नागालँडच्या चार,  मिझोरामच्या आणि उदिशाच्या प्रत्येकी दोघांचा समावेश आहे.


तर महाराष्ट्राच्या 17 वर्षीय नदाफ एजाज अब्दुल रौफचाही बाल शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. नदाफ हा नांदेडच्या पार्डी गावचा आहे. त्याने 30 एप्रिल 2017 रोजी तलावात बुडणाऱ्या दोन मुलींचा जीव वाचवला होता. या कामगिरीसाठी त्याचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बालकांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. या वीर बालकांचा चमू प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही सहभागी होणार आहे. काही वर्षांपूर्वी मुलांचं पथक हत्तीवरुन राजपथावर यायचं, आता ते ओपन जीपमधून येतात.

1957 पासून या बाल शौर्य पुरस्कारांची सुरुवात झाली होती. पहिला बाल शौर्य पुरस्कार हरीश चंद्र मेहराला मिळाला होता.

दिल्लीच्या रामलीला मैदानात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रम सुरु होता, त्यावेळी अचानक तंबूत आग लागली होती. पण हरीश चंद्र मेहरा नावाच्या बालकाने जे प्रसंगावधान दाखवलं त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. तेव्हापासून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या हस्ते अशा वीर बालकांचा सन्मान केला जातो.

या पुरस्कारामध्ये पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कमेचा समावेश आहे. शिवाय पुरस्कार प्राप्त बालकांच्या पुढील शिक्षणाचा खर्च इंडियन काऊन्सिल फॉर चाईल्ड
वेलफेअर या केंद्र सरकारच्या संस्थेमार्फत केला जातो.

बाल शौर्य पुरस्कार विजेती मुलं

नाझिया - उत्तर प्रदेश

दिवंगत नेत्रावती एम चव्हाण - कर्नाटक

करणबीर सिंह - पंजाब

बेत्श्वाजॉन पिनलँग - मेघालय

ममता दलाई - उदिशा

सबॅस्टियन विन्सेट - केरळ

लक्ष्मी यादव - छत्तीसगड

मनशा एन - नागालँड

एन शांगपोन कोंयाक - नागालँड

योअॅक्ने - नागालँड

चिंगई वांगसा - नागालँड

समृद्धी सुशील शर्मा - गुजरात

झोनून्तलाँगा - मिझोराम

पंकज सेमवाल - उत्तराखंड

नदाफ एजाज अब्दुल रौफ - महाराष्ट्र

दिवंगत  लौक्रकपाम राजेश्वर चानू- मणिपूर

दिवंगत एफ लालचंदमा - मिझोराम

पंकज कुमार महंता - उदिशा