अमरावती : जनतेतून निवडून आलेला लोकप्रतिनिधी, मग आमदार असो किंवा खासदार असो, किंवा अगदी नगरसेवकही, एकदा निवडून आले की, परत मतदारापर्यंत जात नाही. कोणतेही काम असेल तर लोकप्रतिनिधींच्या कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात. मात्र अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी ‘घंटो का काम मिंटो में’ अशा घोषणेसह जनतेच्या कामासाठी गावा-गावात राहुटी थाटून ग्रामस्थांची शासकीय कामे मार्गी लावली.


'आमदाराची राहुटी आपल्या गावी' या उपक्रमाद्वारे प्रशासन लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा स्तुत्य प्रयत्न आमदार बच्चू कडू यांनी केला केला आहे.

आपल्या नवनवीन आंदोलनामुळे प्रशासनाला ‘सळो की पळो’ करुन सोडणारे अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू सध्या मतदारसंघातील गावा-गावात जाऊन, त्या ठिकाणी आपली राहुटी थाटतात.

बच्चू कडू यांच्यासोबत झेरॉक्स मशिन, फोटो काढायची मशीन, सेतू केंद्र, सर्व विभाग वेगवेगळ्या चार चाकीमध्ये असतात. त्याचसोबत, प्रशासनातील अधिकारीही असतात. अगदी नायब तहसीलदार, तलाठी, आरोग्य अधिकारी, पुरवठा अधिकारी, असे अधिकारी-कर्मचारीही सोबत असतात.



जागेवरच लोकांची कामं करुन देतात, रेशन कार्ड असो, की श्रावण बाळ योजनेचा फॉर्म भरणे, वयाचा दाखला, अपंगांचा दाखला असो, अशी सगळी कामं एकाच वेळी सर्व अधिकारी सोबत असल्याने तात्काळ होत आहेत.

या उपक्रमातून लोकांची कामं अवघ्या काही  मिनिटात होत असल्याने समाधान मिळत असल्याच्या भावना आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केल्या. त्याचसोबत येणाऱ्या काही काळात आता प्रत्येक गाव शासकीय कामांपासून वंचित राहणार नाही, असे विश्वासही आमदार बच्चू कडू यांनी बोलून दाखवला.

ग्रामीण भागातील, तसेच म्हाताऱ्या,अशिक्षित लोकांना कोणत्याही कामासाठी तहसील च्या ठिकाणी गेल्यावर सरकारी बाबूच्या कामचुकार पनामुळे नाहक त्रास व पैशाचाही भुर्दंड सोसावा लागतो,पण या राहुटीत अनेक महिन्यापासून रखडलेली अनेकांची कामे मार्गी लागल्याचे खुद्द ग्रामस्थ सांगतात.