नाशिक :  मुंबई- नाशिक महामार्गावरील (Mumbai- Nashik Highway)  वाहतूक कोंडीची (Traffic)  समस्या गंभीर बनली असून या महामार्गावरील खड्डेमय रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या खड्ड्यामुळे शिवसेना ठाक गट आक्रमक झाला असून जोपर्यंत मार्गी लागत नाहीत तोपर्यंत विना टोल गाड्या सोडण्यासाठी आंदोलन केले.  आंदोलनादरम्यान शिवसेनेने हायवे रोखून ठेवला आणि टोल नाका बंद पडला. यामुळे काही वेळासाठी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर Nhai कडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर  ठाकरे गटाच्या शिवसैनिकानी आंदोलन मागे घेतले आहे. 


शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर आता विना टोल वाहने सोडली जात आहेत. जो पर्यंत रस्ता  दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल आकारणी करू नका अशी शिवसैनिकाची मागणी आहे.  टोल नाक्यावर पहारा देण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. 31 जुलै पर्यंत रस्ता दुरुस्ती करू,  मात्र टोल माफी संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे NHAI च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 
31 जुलैपर्यंत रस्ता सुस्थितीत आला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा शिवसेनेने इशारा दिला आहे. 


नेमकं काय झालं?


पावसाळा सुरु झाल्यापासून राज्यातील अनेक रस्त्यांची अत्यंत दूरावस्था (Potholes) झाली आहे. राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गापैकी एक असणाऱ्या मुंबई-नाशिक मार्गावर (Mumbai Nashik High way) तर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्यावर वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे, यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावत असून मुंबई ते नाशिक अंतर कापण्यासाठी दुपटीहून अधिकचा कालावधी लागत आहे.  या खड्ड्याविरोधात  शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून घोटी टोल नाक्यावर ठाकरे गटाने आंदोलन केले आहे,  महामार्गांवरील खड्ड्यांविरोधात ठाकरे गटाने घोटी टोल नाका बंद पाडला होता.  आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी  झाले होता.  शिवसेनेने हायवे रोखून ठेवल्याने  दोन्ही बाजूला वाहनांच्या लागल्या रांगा लागल्या होत्या. आता वाहतूक सुरू आहे.  


वारंवार वाहतूक कोंडीचा सामना 


मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी तसेच अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून या महामार्गाला मुक्त करण्याची मागणी कायम होत असते.  मुंबई-नाशिक महामार्ग हा राज्यातला महत्वाचा मार्ग आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिक या शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. मात्र पावसाळ्यापासून या महामार्गावर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची मोठी दूरावस्था झाली आहे. यामुळे या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून या अपघातामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.