मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी (Narendra Dabholkar Murder Case) पुणे सत्र न्यायालय आज आपला निकाल जाहीर करणार आहे. दाभोळकर यांच्या हत्येच्या 11 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागणार आहे. मात्र प्रत्यक्ष खटला 15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात सुरू झाला होता. याप्रकरणी आपला राखून ठेवलेला निकाल शुक्रवारी 10 मे रोजी देण्यात येणार आहे. 


याप्रकरणी पाच आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला. ज्यात वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांचा समावेश आहे. यापैकी संजीव पुनाळेकर व विक्रम भावे हे सध्या जामीनावर बाहेर आहेत.  विशेष सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव काय निकाल देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.


दाभोळकरांची हत्या कधी आणि कशी?


डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 च्या सकाळी सव्वासातच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी अगदी जवळून त्यांच्यावर पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या होत्या. ज्यात एक गोळी डॉ. दाभोलकरांच्या छातीत दुसरी डोक्यात गेली होती. दाभोलकरांच्या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली होती.


पुरोगामी महाराष्ट्रात अशाप्रकारे एखाद्या विचारवंताची हत्या होते, हे वास्तव कित्येकांना अस्वस्थ करणारे ठरलं. पण हत्येचं हे सत्र इथंच थांबलं नाही, त्यानंतर कालांतरानं कॉम्रेड गोविंद पानसरे (2015), एम.एम कलबुर्गी (2015) आणि पत्रकार गौरी लंकेश (2017) यांचीही अश्याचप्रकारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आणि या सा-या हत्या एकमेकांशी कश्या जोडलेल्या आहेत?, याचा तपास अजुनही सुरूच आहे.


तपासाची दिशा आणि दशा -


डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास सुरूवातीला पुणे शहर पोलीसांनी सुरू केला होता. त्यानंतर यात दहशतवादविरोधी पथकाची (एटीएस) एन्ट्री झाली. मात्र तपास अतिशय समाधानकारक असल्याचा आरोप करच आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानं हा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) कडे सोपविण्यात आला. 


मात्र 2018 मध्ये गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणा-या कर्नाटक एटीएसनं पुण्यात येऊन अमोल काळेला अटक केली. त्यानंतर याप्रकरणातील धागेदोरे पकडत तपासयंत्रणेला दाभोलकर प्रकरणात यश मिळालं. डॉ. तावडेला पनवेलमधील सनातन संस्थेच्या आश्रमातून अटक करण्यात आली. विक्रम भावेनं डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपूर्वी घटनास्थळाची पाहणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ॲड. पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांनी आरोपी सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना पिस्तूल खाडीत फेकून नष्ट करण्याचा सल्ला दिला होता जे अद्याप सापडलेलं नाही, असं आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.


डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात सनातन संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (सातारा), सचिन अंदुरे (छत्रपती संभाजीनगर), शरद कळसकर (जालना), विक्रम भावे आणि ॲड. संजीव पुनाळेकर (मुंबई) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध पुण्यातील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. ज्यात (आयपीसी) कलम 302 (हत्या), 120 (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), कलम 34 नुसार शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत आरोपींवर गुन्हे दाखल आहेत.


ही बातमी वाचा: