नांदेड: संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. गणेशोत्सवाच्या काळात अकरा दिवस गणेशाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणेश मूर्तीचं विसर्जन करण्याची पद्धत आहे. मात्र नांदेड जिल्ह्यातील पलज इथे एक अनोखी परंपरा आहे.


 

महाराष्ट्र - आंध्रप्रदेश सिमेवरच्या पाळज गावात लाकडाच्या गणेशमूर्ती स्थापन केल्या जातात. गणेशोत्सवानंतर गणेशाची मूर्ती गुंडाळून पुढच्या वर्षासाठी ठेवण्यात येते. गेल्या 68 वर्षापासून सातत्याने ही अनोखी परंपरा पाळजकरांनी जोपासली आहे. विशेष म्हणजे अशी प्रथा जोपासणारं बहुदा हे राज्यातील एकमेव गाव आहे.

 

1948 साली मराठवाडा मुक्ती संग्राम सुरू असतानाच निजामाच्या जुलमी राजवटीने पाळज भागात थैमान घातले होते. मातृभूमीच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करले. तेव्हा गावातील काही लोक एकत्र आले. त्यांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव करण्याचा निश्चय केला. त्यावेळचे प्रसिद्ध काश्ठशिल्पकार गुंडाजी पांचाळ यांच्याकडून 51 रुपये देवून गणपतीची लाकडी मूर्ती आणण्यात आली.

 

थोड्याच दिवसात मराठवाडा निजामाच्या गुलामीतून मुक्त झाला. त्यामुळे हा गणपतीच आपला रक्षणकर्ता आहे अशी लोकांची भावना झाली. मात्र गणपतीचं विसर्जन केल्यास गावावर विघ्न येईल, अशी गावकऱ्यांची धारणा होती. त्यामुळे तेव्हापासून गणपती विसर्जन न करण्याचीच परंपरा गावाने कायम ठेवली आहे.

 

या मंदिरात मुंबई, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून लाखो भाविक येतात. गणेशोत्सवात गावात यात्राही भरते. या दरम्यान सुमारे 2 कोटी रुपयांची उलाढाल होते.

 

इथं येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून खिचडी देण्याची प्रथा आहे. रोज किमान शंभर क्विंटल तांदूळ यासाठी लागतो. गणेश उत्सवाच्या काळात लाकडाची ऐतिहासीक मूर्ती मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात येते.

 

उर्वरीत वर्षभरात याच गणेशमूर्तीचे छायाचित्र मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवलं जातं. त्यामुळं सार्वजनिक गणेश उत्सवाच्या काळात इथं भाविकांची तोबा गर्दी होते.