नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा नांदेडमध्ये बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळालं. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 8 हजार 182 शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये टाकले. मात्र अवघ्या काही तासातच 1 हजार 21 लाभार्थी शेतकऱ्यांना हे पैसे परत करण्याचे निर्देश बँकेने दिले.


गोरखपूरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी देशातील 1 कोटी 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेचा पहिला हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केल्याचा दावा करण्यात आला. मात्र नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकलेले पैसे परत मागितल्याने हा दावा फोल ठरतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

महत्वाची बाब म्हणजे, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून एका मेलद्वारे पैसे परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र त्यामागचं कारण सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झाला आहे.

VIDEO | शेतकरी सन्मान योजनेतून मिळालेले पैसे परत करा | नांदेड | एबीपी माझा


VIDEO | तुमच्या खात्यात दोन हजार आले का? | एबीपी माझा