Lok Sabha 2024 Nagpur : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार (Vilas Muttemwar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर नागपुरात भाजप (BJP) चांगलीच आक्रमक झालीय. विलास मुत्तेमवार यांच्या घरासमोर भाजप आणि भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत नारेबाजी केलीय. त्यामुळे नागपुरातील उष्णतेच्या पाऱ्यासह राजकीय पारा देखील कमालीचा तापला असल्याचे बघायला मिळत आहे. अशातच आता काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपच्या नेत्यांना सज्जड दम भरला आहे.


भाजपच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी. अन्यथा निवडणूक जाईल दुसऱ्या बाजूला आणि इथे वेगळंच काही घडेल, असा इशारा विकास ठाकरे यांनी दिला आहे. आम्हाला शहराची शांतता कधीही भंग करायची नाही. मात्र, सत्ताधाऱ्यांनी आपला संयम बाळगून विरोध करावा. शांतप्रिय नागपूर शहरात चुकीचा पायंडा कोणीही पाडू नये, असेही विकास ठाकरे म्हणाले. 


भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना समज द्यावी, अन्यथा...


काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी जे वक्तव्य केलं होतं ते 'अबकी बार चरसो पार' हा जो भाजपचा नारा आहे त्याबाबत केले होते. मात्र यामध्ये कुणाचेही नाव अथवा तसा उल्लेख त्यात केलेला नव्हता. असे असताना या लोकशाहीमध्ये कोणी बोलले तर तुम्ही त्याच्या घरावर जात आहात. म्हणजे जर आता तेवढाही अधिकार नसेल तर मग याबाबत विचार केला पाहिजे. घरावर केवळ यांनाच येता येत का, आमच्याकडे देखील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आहेत. आम्ही जर असा विचार केला तर या शहराची शांतता भंग झाल्याशिवाय राहणार नाही.


मात्र, आम्ही तसे कदापि करणार नाही. आम्ही रीतसर निवडणूक आयोग किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे याबाबत तक्रार करू. आज यांचे 20 लोक रस्त्यावर आलेत तर उद्या आमचे कितीतरी पट जास्त संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. मात्र ही पद्धत अतिशय चुकीची असून याचे समर्थन कोणीही करणार नाही. आपल्याला निवडणूक सोडून हे बाकीचे उद्योग करायचे आहेत का? मात्र, असे असताना सत्ताधारी पक्षांनी जरा संयमाने वागलं पाहिजे. असा सल्लाही काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. 


भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल व्हावे - विकास ठाकरे 


भाजप कार्यकर्त्यांची ही पद्धत अतिशय चुकीची असून असा पायंडा कधीही पडता कामा नये. आज नागपूर मतदारसंघात सर्वच पक्षातील उमेदवार आहेत. त्यामुळे इतर सर्व भाजप विरोधात जाऊन आज निवडणूक लढत आहेत. त्यामुळे आमच्या कडे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे मनुष्यबळ आहे. एक बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचल्यास मोठा असंतोष निर्माण होईल. आम्हाला नागपूर शहरातली शांतता कधीही भंग होऊ द्यायची नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी. सोबतच या प्रकरणातील जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी ही विकास ठाकरे यांनी बोलताना केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या